जळगाव – बळीराजाची फसवणूक टाळण्यासाठी आगामी अधिवेशनामध्ये विशेष कायदा करण्यात येईल, असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
अमळनेर येथील विकासकामांचे ऑनलाईन उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर, आमदार चिमणराव पाटील, शिरीष चौधरी, अनिल पाटील, लताताई सोनवणे व मान्यवर उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, राज्य सरकार शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हितासाठी काम करीत आहेत. बळीराजाच्या हिताला शासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टाळून त्यांना संरक्षण मिळण्यासाठी विशेष कायदा आणण्यात येईल. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे एसआरपीएफच्या बटालियनचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल. महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखणे, दोषींवर कारवाई करुन त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी आंध्रप्रदेश राज्याच्या धर्तीवर कायदा करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्य शासनाने राज्यातील पोलिसांच्या वसाहतींसाठी पहिल्या टप्प्यातच 750 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील पोलीस वसाहतींच्या प्रस्तावांना टप्प्याटप्प्याने मंजुरी देऊन या वसाहती गतीने पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.