करोनाचे संकट ओढवल्यानंतर शहर लॉकडाऊन झालेले असताना केवळ समाजमनाशी नाळ जोडली गेली असल्याने सामाजिक योगदानाचे संस्कार झालेल्या काही व्यक्तीच नागरिकांच्या मदतीसाठी पुढे आल्या. घरी निवांत बसून राजकारण करण्यापेक्षा आपल्या झोळीतील इतरांच्या हाती देण्याची दानत काही लोकांमध्येच दिसली. स्वत:च्या घरातील चूल पेटत असताना उपाशी असलेल्यांना मुठभर तरी धान्य मिळावे यासाठी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोक अन्नदानासाठी सरसावले.
साहेबांची सावली…
बेलदरे घराला सामाजिक सेवेचा वारसा लाभलेला असला तरी पूर्वीपासूनच यशवंतराव चव्हाण आणि त्यानंतर शरद पवार यांच्या विचारांचा पगडा बेलदरे कुटुंबीयांवर राहिलेला आहे. पवार साहेबांच्या विचारांतूच बेलदरे कुटुंबीयांच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीचा पाया रचला गेला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर कळत्या वयातच युवराज बेलदरे यांनी पवार सोहबांच्या आदेशाने राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. आज, अजितदादा आणि सुप्रियाताईंच्या नेतृत्त्वातून पक्षाची युवा वाटचाल यशस्विरित्या वेगाने सुरू आहे. साहेबांची साथ आणि दादा-ताईंच्या मार्गदर्शनातूनच युवराज बेलदरे समाजमान्य युवा नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत.
जीवाला जीव देणारं आपलं माणूस म्हणून कोणी तरी आधार देत असल्याची भावना ज्यांच्यामुळे निर्माण झाली, असे खूप कमी चेहरे जनमाणसात पुढे आले. यातीलच एक नाव कात्रज, आंबेगाव बुद्रुक परिसरात आजही सामान्य नागरिकांत चर्चेत असते ते म्हणजे युवराज बेलदरे. प्रभाग 40च्या नगरसेवकापेक्षा आपलं माणूस म्हणूनच त्यांची अधिक ओळख तळागळापर्यंत झाली आहे.
सुप्रियाताईंची साथ…
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी नगरसेवक युवराज बेलदरे यांच्या कामाचे नेहमीच कौतुक केले आहे. त्यांनी ताईंकडे कोणतेही काम नेले की होतेच, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. याबाबत नागरिकही दुजोरा देतात. आंबेगाव बुद्रुक येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पास मंजुरी, कात्रज बाह्यवळण ते नवलेब्रीज महामार्गाचे बरेचसे प्रलंबित प्रश्न युवराज बेलदरे यांनी सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली सोडविले आहेत. आंबेगाव बु. मधील दशक्रिया घाट तसेच अनेक ओढ्यालगतच्या सोसायट्यांच्या संरक्षक भिंतींचे काम मार्गी लावण्यातही युवराज यांचा मोठा वाटा राहिला आहे.
करोनाच्या महाभयंकर आजाराशी लढताना केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्याच्या अडचणींनाही समाजाला समोरे जावे लागत आहे, सामाजिक स्थित्यंतराच्या या कठीण काळात केवळ मदत म्हणून वस्तू तसेच औषध गोळ्यांचे वाटप करूनही चालणार नसल्याचा बारीक विचार करून जनसामान्यांना मदत करतानाच त्यांना मानसिक आधार देण्याचे काम युवा नेते युवराज बेलदरे मोठ्या खुबीने करीत आहेत.
करोनामुळे ज्याप्रमाणे आर्थिक अडचणी वाढल्या त्याचप्रमाणे मानसिक आणि सामाजिक समस्याही म्हणजेच सायको सोशल प्रॉब्लेम वाढले, यामुळेच मदत करण्याबरोबरच अडचणीतील नागरिकांबरोबर समुपदेशकांच्या भूमिकेतून बोलणे महत्त्वाचे असल्याचे तसेच रोजच्या जेवणात ज्याप्रमाणे मीठाचे महत्त्व असते, त्याचप्रमाणे जीवनात प्रसन्नताही महत्त्वाची असते, असे युवराज बेलदरे स्पष्टपणे सांगतात. यामुळेच लोकांच्या जीवनात प्रसन्नता टिकवण्यासाठी परिसरातील नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवणारे नेतृत्त्व म्हणून नगरसेवक बेलदरे यांचे नाव घेतले जाते.
प्रशासनावर पकड…
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दादा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा आदर्श नेहमीच युवराज बेलदरे यांनी ठेवला आहे. राजकारणापेक्षा समाजकारणावर भर देण्याचे राजकीय संस्कार त्यामुळेच बेलदरे यांच्यावर झालेले दिसतात. समाजासाठी कोणतेही काम करताना प्रशासनावरही पकड असणे गरजेचे असते. अजितदादा यांचा हा गुण बेलदरे यांच्यामध्ये स्पष्ट दिसतो. यामुळेच करोनाच्या काळातही आपल्या प्रभागातील अनेक विकासकामे त्यांनी मोठ्या खुबीने मार्गी लावली. करोना काळात आरोग्य यंत्रणा राबवितानाही बेलदरे यांची प्रशासकीय पकड मजबूत असल्याचे वेळोवेळी जाणवल्याचे नागरिक सांगतात.
सामान्य जनता सध्याच्या व्यवहारात गोंधळलेली आणि धास्तावलेली अधिक दिसते. यामुळे मदतीसह जनजागृतीसारखे उपक्रम बेलदरे यांच्यासह मित्रमंडळींकडून या परिसरात राबविले जात आहेत. आरोग्याच्या दृष्टीने करोनाकडे पाहणे महत्त्वाचे आहेच, पण या वायरसचे अर्थकारणावर होणारे परिणाम ही अतिशय तीव्र असल्याचे लक्षात घेत युवराज बेलदरे यांनी नोकरी, रोजगार, व्यावसाय तसेच युवकांना मार्गदर्शन याचा विचार केलेला असून त्यादृष्टीने काम सुरू आहे.
या कामांमुळेच जनसामान्यांचे नेतृत्त्व…
करोनाच्या संकटकाळात सॅनिटायझर, मास्क तसेच अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप, प्रभागातील सर्व सोसायट्यांमध्ये निर्जंतुकीकरण, गरजू, गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, करोना टेस्टसह आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन, नागरिकांचे आरोग्यमान राखण्यासाठी सातत्याने जनजागृती. प्रभागातील प्रत्येक भागाचा कार्यकर्त्यांद्वारे सातत्याने आढावा. करोनाबाधित आढळल्यास आर्थिक बाबींसह कुटुंबातील सदस्यांना मानसिक आधार. युवकांना रोजगाराबाबत सातत्याने मार्गदर्शन व मदत. नव्या उद्योग-व्यावसायासाठी अर्थसंस्थाद्वारे मदत देण्यात प्रयत्न.
युवकांचा नेता म्हणून त्यांच्या हिताचा विचार करणारे कात्रज, आंबेगाव भागातील कुशल नेतृत्व म्हणून नगरसेवक युवराज बेलदरे यांच्या विचारांना पाठिंबा देत हजारो युवक त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसते.
ही आहेत कामाची वैशिष्ट्ये…
करोना काळात प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचले. प्रभागातील छोट्या-मोठ्या व्यापारी, दुकानदारांचे प्रश्न जाणून घेतले. नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी दररोज जनता दरबार. प्रत्येक नागरिकांचे वैयक्तिक म्हणणे समजून घेतले. स्वर्गीय माजी सरपंच संभाजी नाना बेलदरे ट्रस्ट मदतीसाठी सैदव तत्पर. प्रभागातील विद्यार्थ्यांशीही गप्पा व मार्गदर्शन करीत आवश्यक ती मदत. प्रत्येकाच्या घरात रेशन धान्य पोहोचविण्याचे प्रयत्न. पाणी, वीज, रस्ते यासारख्या मूलभूत समस्या सोडविण्यावर प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद. पालिकेच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधून कामे मार्गी लावण्यावर भर.
करोनामुळे जागतिक अर्थव्यस्थेवर बोलणारे बोलघेवडे अनेक जण दिसतात; परंतु प्रत्यक्षात समाजासाठी युवकांच्या मदतीला कोणी येत नाही. मात्र, याच अडचणीच्या काळात बेलदरे हे युवकांमागे भक्कमपणे उभे राहिलेले आहेत.
या परिसरात राहण्यासाठी आल्यानंतर नवखा होतो; परंतु बेलदरे यांच्याशी विविध कामांबाबत संपर्क आला. त्यांच्यातील आपलेपणा खूप भावला. आज कित्येक वर्षे झाली; परंतु बेलदरे यांच्या घराचा हा वारसा कायम आहे. विशेष म्हणजे युवराज बेलदरे यांनी तो जपला आहे. हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. कोणतीही समस्या घेऊन गेले तरी ती सुटणार याची हमी असते. करू, पाहू, सांगतो अशी उत्तरे त्यांच्याकडून कधीच मिळत नाहीत आणि मिळणारही नाहीत. त्यामुळे आपला माणूस म्हणून युवराज हे जवळचे वाटतात. आम्ही आणि आमच्यासारखे कित्येक जण त्यांना आमच्याच कुटुंबातील एक व्यक्ती मानतो.
श्री. सुनील पाबळे
चेअरमन, चिंतामणी सह. सोसा.
यामुळेच सुशिक्षित, उच्चशिक्षित यांसह अगदी रिक्षावाले, हातगाडीवाले, चहावाले, गॅरेजवाले, अर्धकुशल, अकुशल कामगारांसह सर्वच समाजवर्गातील लोक युवराज बेलदरे यांच्यासमोर खुल्या मनाने आपले प्रश्न मांडताना दिसतात. विशेष म्हणजे येथेच सुटू शकतात, असा ठाम विश्वास जनमाणसांत निर्माण झाला आहे.
आंबेगाव बुद्रुक गाव परिसरात बेलदरे पाटील कुटुंबीयांनी जनमाणसांतील हा विश्वास कायम टिकवला आहे. स्वर्गीय संभाजी नाना बेलदरे यांनी सरपंचपद सांभाळताना अनेकांना मदतीचा हात दिला आहे. हा वारसा युवराज बेलदरे समर्थपणे पेलत असल्याचे अडचणीच्या काळात परिसरातील नागरिकांनी अनुभवले आहे.
शब्दांकन
संतोष कचरे