प्रा. विजया पंडित
पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होण्याची शक्यता आहे. पण पृथ्वीच नष्ट झाली तर? त्याची शक्यता कितपत आहे? याविषयीही शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे. त्याबाबत…
पृथ्वी अनादि आणि अनंत आहे. तसे हे ब्रह्मांडच अनादि अनंत आहे. पृथ्वी त्याचाच एक भाग आहे. प्रत्येक वस्तूचा शेवट हा असतोच, मग ती वस्तू सजीव असो वा निर्जीव. तसाच पृथ्वीचाही शेवट असणारच आणि तो आहे, असे शास्त्रज्ञांना वाटते.
जीवाश्मांचा पुरावा आपल्याला सांगतो की पृथ्वी या ब्रह्मांडात 3.5 अब्ज वर्षांपासून फिरते आहे. एवढ्या काळात तिने भयंकर हिमयुगे पचवली, अंतराळातून बरसणारे दगड सहन केले, अत्यंत विषारी आणि विखारी किरणोत्सर्ग सोसला. तरीही पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट झाली नाही. मग या पुढील काळात तरी ती कशी नष्ट होईल? तरीही अशी काही महाकाय संकटे आहेत ज्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका आहे.
पृथ्वीचा अंत आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अंत या दोन्हीविषयी शास्त्रज्ञ अंदाज व्यक्त करत आहेत. पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अंत होऊ शकेल अशा घटना प्राचीन काळात घडल्या आहेत, तशा पुढील काळातही घडू शकतात.
साधारण 25 कोटी वर्षांपूर्वी म्हणजे पर्मियन युगाच्या शेवटी पृथ्वीवरील 85 टक्के जीवसृष्टी नष्ट झाली होती आणि त्यातील 95 टक्के जीव हे समुद्रातील होते. त्यावेळी नेमके काय झाले याबाबत कुणी खात्रीशीरपणे काही सांगू शकत नाही.
पण ही जीवसृष्टी नष्ट होण्याच्या या कालखंडात ज्वालामुखीचे भयंकर उद्रेक होत होते आणि तेही अशा भयंकररितीने की जीवसृष्टी तग धरणे अशक्यच होते. या काळातही ज्वालामुखीचे उद्रेक होतात आणि त्यामुळे होत असलेले नुकसान पाहून आपण भयचकीत होतो. पण त्यातून होणारे नुकसान हे 25 कोटी वर्षांपूर्वी झालेल्या नुकसानाच्या तुलनेत काहीच नाही.
त्यावेळी सैबेरियाच्या मोठ्या जमिनीवर लाव्हा पसरला तेव्हा तेथील जीवसृष्टी पार गुदमरून गेली. त्यानंतर असे उद्रेक झाले. पण अगदी तुरळक. त्यानंतर 20 कोटी, 18 कोटी आणि 65 लाख वर्षांपूर्वी असे उद्रेक झाले. याचा अर्थ विनाशकारी उद्रेक वारंवार होत नाहीत. पण ते घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. प्रश्न आहे तो केव्हा होईल आणि कुठे होईल याचा.
नॉर्वेतील ओस्लो विद्यापीठातील शास्त्रज्ञ हेन्रीक स्वेन्सेन यांनी केलेल्या संशोधनानुसार जिथे पृथ्वीचे कवच फोडून ज्वालामुखीचा लावा बाहेर पडतो, तेव्हा तो किती वेगाने येतो यावर पृथ्वीवरील जीवसृष्टी किती प्रमाणात नष्ट होईल हे अवलंबून आहे.
म्हणूनच 25 कोटी वर्षांपूर्वी झालेला ज्वालामुखीचा उद्रेक सर्वत: तेव्हाच्या जीवसृष्टीच्या विनाशाला कारणीभूत ठरला असेल, असे वाटत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार मीठ या घटकामुळे त्यावेळी जीवसृष्टी नष्ट झाली असावी. सैबेरियात मिठाचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत.
जेव्हा ज्वालामुखीच्या उष्णतेने ते गरम झाले तेव्हा त्यातून ओझोन नष्ट करणारे रासायनिक घटक बाहेर पडले आणि त्यामुळे बहुतांश जीवसृष्टी नष्ट झाली. आताही पृथ्वीवर मिठाचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत.
साधारण 45 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक लघुग्रह धडकला आणि त्यामुळे झालेल्या उलथापालथीत डायनासोर नष्ट झाले, असा एक सिद्धांत मांडला जातो. आताही अशी घटना होऊ शकते. पण असा लघुग्रह पृथ्वीवर नेमका कुठे धडकतो त्यावर जीवसृष्टीची किती हानी होईल हे अवलंबून आहे.
कॅनडात असलेले मॅनिकुआन विवर हे लघुग्रहाच्या धडकेने तयार झाले आहे. ही धडक साधारण 21 कोटी वर्षांपूर्वी झाली. पण त्यामुळे डायनासोरप्रमाणे मोठ्या प्रमाणावर जीवसृष्टी नष्ट झाली नाही. याचे कारण एक हे असावे की, हे विवर त्यामानाने कमी तीव्रतेच्या धडकेने बनले आहे आणि आतल्या स्फटीकयुक्त खडकातून तयार झाले आहे. वालुकामय खडकांत तयार झालेली विवरे ही जास्त विनाशकारी असतात.
यावर लघुग्रह आदळल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ निर्माण होऊन कदाचित हवामान बदलही घडू शकतो आणि त्यातून जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका आहे. शिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर जीवसृष्टी होण्याइतपत लघुग्रह आदळण्याच्या घटना पृथ्वीवर अत्यंत दुर्मिळ आहे. भविष्यकाळातही अशी घटना घडण्याची शक्यताही खूपच धूसर आहे.
पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र दुर्बल होत असल्याचे तुम्ही वारंवार ऐकत असाल. पण यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. या चुंबकीय क्षेत्राची दिशा बदलू शकते, पण ते मृत होत नाही आणि दिशाबदलाची प्रक्रियाही लाखो, कोट्यवधी वर्षांतून घडत असते. पण हे चुंबकीय क्षेत्रच नष्ट झाले तर? पण केंब्रिज विद्यापीठाचे रिचर्ड हॅरीसन यांच्या मते असे होण्याची अजिबात शक्यता नाही. त्यातून तसे घडलेच तर पृथ्वीचा बाहेरील गाभा गोठेल पण असे होण्याची शक्यता नाहीच.
एक सिद्धांत असा आहे की प्रत्येक गोष्ट एका निश्चित अशा वेळी स्वत:ला मुक्त करते. कारण ऊर्जा कायम बंधनात राहू शकत नाही. प्रत्येक जीव ऊर्जेची एक चौकट किंवा फ्रेमवर्क असतो आणि ही फ्रेमवर्क स्वत:ला मुक्त करतात. या सिद्धांताला “एपोप्टोसिस’ असे म्हटले जाते. पण या सिद्धांतावर मात करणारा एक सिद्धांत आहे तो म्हणजे अमरत्वाचा सिद्धांत.
प्रत्येक जीव आपल्या मृत्यूच्या आधी आपले प्रारूप तयार करून अमरत्व प्राप्त करते. म्हणजे एखादे झाड मरण पावते, पण त्यापूर्वी त्याचे बीजारोपण होऊन त्याची अनेक रूपे झाडांच्यारूपाने जिवंत असतात. एक माणूस मरतो, पण त्याच्या संततीच्या रूपाने तो जिवंत असतो. तसेच पृथ्वीचेही आहे. पृथ्वीची बीजे अन्य ग्रहांवर प्रस्थापित होऊन, ती अंकुरित झाली तर त्यातून नवी पृथ्वी आकार घेऊ शकते.
पृथ्वीवर होणाऱ्या अनेक बदलांना माणूस कारणीभूत आहे. पृथ्वीवर चालणाऱ्या निसर्गचक्रात गडबड होण्यामागे मानवी हस्तक्षेप हे महत्त्वाचे कारण आहे. अलिकडे लॉकडाऊनच्या काळात मानवी सक्रियता खूप कमी झाल्यामुळे निसर्गाचे चक्र सुरळीत झाल्याचे दिसून आले होते. प्रदूषण कमी झाले होते, वन्यप्राणी सुरक्षितपणे हिंडू फिरू लागले होते.
नद्यांचे पाणी स्वच्छ झाले होते. एकूणच पर्यावरण शुद्ध झाले होते. पृथ्वीवर यापूर्वी ज्या घडामोडी घडल्या त्या नैसर्गिक होत्या. पण आता पृथ्वीच्या ऱ्हासाला पृथ्वीवरचाच एक घटक म्हणजे माणूस जबाबदार ठरतो की काय अशी शंका निर्माण व्हावी अशी स्थिती आहे.