नवी दिल्ली – पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या विधानावरून काही दिवसांपूर्वी राजकारण चांगलेच तापले होते. एल्गार परिषदेचे पुण्यात शनिवारी ३० जानेवारी रोजी आयोजन केले होते. त्यात अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे शरजिल उस्मानी यांचे भाषण झाले होते. त्यात त्याने हिंदुविषयी आपत्तीजनक व भडकावू विधाने केल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला. याप्रकणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून एल्गार परिषदेतील भाषण आक्षेपार्ह नसल्याचे शरजिल उस्मानी याचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे येथील स्वारगेट पोलीस ठाण्यात शरजिल याच्याविरोधात आयपीसी कलम १५३ (ए) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. यावर आता शरजिल याने हे सर्व आरोप फेटाळले आहेत . भाषण करण्यापूर्वी किंवा नंतर घटनास्थळावर असंतोष किंवा हिंसाचार झाला नाही. समाजातील जातीय सलोखा बिघडविण्यासाठी आणि फौजदारी न्यायव्यवस्थेचा ससेमिरा पाठी लावून खुलेपणाने व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर आळा घालण्यासाठी असे गुन्हे नोंदविण्यात येतात, असे उस्मानीने याचिकेत म्हटले आहे.
तत्पूर्वी, भाजप या मुद्दावर आक्रमक असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेच तक्रार केली होती. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती.