आदरणीय एसपी सर,
आपण एका पोलीस ठाण्यात पाच वर्षे पूर्ण झालेल्या पोलिसांच्या बदल्यांबाबत दि. 15 रोजी होम डीवायएसपींच्या सहीने एक आदेश काढला. अन् खात्यात कॉन्स्टेबल म्हणून आल्यानंतर सहाय्यक फौजदार झालो तरी कुठतरी खितपत पडलो असल्याची भावना झाल्याने तसेच वशिला असल्याशिवाय चांगल्या ठिकाणी बदली मिळत नसल्याची भावना मनात उफाळून आल्याने आज आपल्याशी खात्यातला एक जवान म्हणून संवाद साधत आहे…
साहेब, कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याची एका पोलीस ठाण्यात सहा वर्षे अन् उपविभागात बारा वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याची बदली करण्यात यावी हा आपल्या खात्याचा शिरस्ता आहे. मात्र, गेली कित्येक वर्षे खात्यात काम करत असताना हा शिरस्ता केवळ कागदावर पाहण्यात आल्याने आज “प्रभात’च्या माध्यमातून आपल्यासोबत मन मोकळं करत आहोत.
साहेब, आपल्या पोलीस खात्यात काम करणाऱ्या प्रत्येकाची कुंडली काढून आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, अनेकांनी एकाच ठिकाणी गेली अनेक वर्षे काढली आहेत. कधी बदलीने तर कधी प्रतिनियुक्तीने हा त्यांचा खेळ सुरूच आहे. तर काहींनी कराड शहर वाहतूक शाखा मग सातारा शहर वाहतूक शाखा अन् हे झाले की, जिल्हा वाहतूक शाखा मग मानाची समजली जाणारी एलसीबी असा आपल्या नोकरीचा आलेख चढता ढेवल्याचे आपल्या लक्षात येईल. साहेब, आपल्याला वाटेल आमच्याकडे “ती’ गुणवत्ता नसल्याने आमच्यासोबत असे झाले असेल तर ते जरा चुकीचे असू शकेल.
कारण आमच्याकडे गुणवत्ता आहे पण वशिला नसल्याने आम्ही कुठतरी खितपत पडायचे अन् ज्यांचा वशिला आहे त्यांनी चांगल्या मोक्याच्या ठिकाणी गुळ पाडायचा धंदा सुरू केला आहे. साहेब,एखाद्याची खरच अडचण आहे तर ते समजण्यासारखे आहे.
पण केवळ रूबाब गाजवण्यासाठी अन् काहीतरी मिळावे म्हणून अशा मोक्याच्या जागा वर्षानुवर्षे अडवल्या जाणार असतील तर नव्याने खात्यात आलेल्या पोरांनी कधी काम शिकायचे, सेवानिवृत्तीकडे आलेल्यांनी कधी काम करायचे, याकडे आपण कटाक्ष टाकणे गरजेचे आहे. काहींनी तर वाहतूक शाखेतून पोलीस ठाण्यात बदलून गेल्यावर तिथल्या अधिकाऱ्यांपुढे “सजन’पणाचा देखावा करून पोलीस ठाण्यात सेमी वाहतूक शाखा चालू करण्यास भाग पाडले आहे.
त्यामुळे सातारा शहरात येणाऱ्या कुठल्याही रस्त्यावर अगदी पाच दहा किलोमीटर अंतरावर पाहिले तर यांचे “जकात नाके’ आपल्याला दिसून येतील. सातारा शहर वाहतूक शाखेचे काही कर्तव्यदक्ष कर्मचारी तर दुपारी जेवायला पण घरी जात नाहीत. महामार्गावरून जाणाऱ्या गाड्यांना अडवले की त्यांचे पोट भरले जात असल्याची चर्चा आहे. मग मला सांगा, यांची भूक अशी भागणार असेल तर हे कशाला जागा खाली करतील.
त्यामुळे साहेब, आपल्याला हात जोडून विनंती आहे की, किमान यंदा होणाऱ्या बदल्या तरी पारदर्शक करा. ज्यांची अडचण आहे त्यांच्याबद्दल आमचे काही म्हणणे नाही. पण अडचणीच्या नावाखाली भानगडी करण्यासाठी विनंती करणाऱ्यांना कोयना, महाबळेश्वर दाखवण्याची गरज आहे.
तुमचाच पोलीस जवान