सातारा -शासन यावर्षी सोयाबीनसाठी राज्यात तीन हजार 880 रुपये हमी भाव देणार असून येत्या 15 ऑक्टोबरपासून राज्यात खरेदी केंद्रे सुरु होतील, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
राज्यात यावर्षी चांगला पाऊस झाला. हा पाऊस आताही सुरु आहे. राज्यातील सोयाबीनचे पिक काढणे व मळणीचे काम अंतिम टप्यात आहे. काही शेतकरी आपला माल लवकरात लवकर विकावा, यासाठी खासगी व्यापाऱ्यांकडे जात आहेत. शेतकऱ्यांनी राज्य शासनाने सुरु केलेल्या खरेदी केंद्रांवर आपला माल विकावा, असे आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केले. राज्यात अजूनही पाऊस पडत असल्यामुळे सोयाबीनला ओलसरपणा येण्याची शक्यता आहे.
काढलेल्या सोयाबीनच्या विक्रीची घाई शेतकऱ्यांनी करु नये, सोयाबीनला राज्य शासनाने 3 हजार 880 रुपये भाव दिला आहे. राज्य शासनाकडून 15 ऑक्टोंबरपासून सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे. राज्य शासनाने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी करुनच शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.