मुंबई- नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. महामार्गावरील वाहनांच्या भरधाव वेगामुळे अपघातांची भीषणताही अधिक असून अनेकांना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे.
या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, समृद्धी महामार्गावर लवकरच एअर ऍम्बुलन्स सेवा सुरू करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.
समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना तातडीने मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारकडून एअर ऍम्बुलन्सची सेवा उपलब्ध करून देण्या येणार आहे. त्यासाठी सरकारने अनेक हेलिकॉप्टर कंपन्यांशी बोलणी सुरू केल्याची माहिती आहे.
हेलिकॉप्टर कंपनीशी करार झाल्यानंतर समृद्धी महामार्गावर अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना हेलिकॉप्टरने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.
याशिवाय राज्यातील काही महत्त्वाच्या रुग्णालयांसोबतही राज्य सरकारकडून करार केले जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळणे शक्य होणार असून अपघातग्रस्तांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
स्थानिकांना प्रवेशास होतो विलंब
समृद्धी महामार्गावर आखून दिलेल्या मार्गांनीच प्रवेश करता येतो. अनेक ठिकाणी मार्गावर जाण्यासाठी व खाली उतरण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग नाही. याशिवाय काही ठिकाणी महामार्गाला कुंपण करण्यात आल्याने अपघात झाल्यानंतर स्थानिकांना महामार्गावर येता येत नाही.
अशात महामार्ग हा आजुबाजूच्या परिसरापासून उंचीवर असल्याने खाली असलेल्या रहिवाशांनाही अपघात झाला आहे की नाही? हे समजत नाही. त्यामुळे जखमींना तातडीने मदत मिळत नाही.
आग किंवा धुरामुळे स्थानिकांना अपघाताची माहिती मिळाली तरी त्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी जाणे, रुग्णवाहिकेला फोन करणे, त्यानंतर रुग्णवाहिका येणे यात बराचसा वेळ जातो. त्यामुळे बहुतेक अपघातग्रस्तांचा जागीच मृत्यू होतो.