मुंबई – जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूर याला चित्रपटसृष्टीत दाखल होऊन दोन दशके झाली. मुझे कुछ कहना है या चित्रपटाद्वारे त्याचा बॉलीवूडमधील प्रवास सुरू झाला.
त्याला आता बराच काळ लोटला आहे. दरम्यानच्या काळात त्याने अनेक चित्रपटांत चांगल्या भूमिकाही केल्या. आता इतक्या वर्षांनी त्याला पदार्पणाचा काळ आठवतो आहे.
एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला. तुषार म्हणतो, तेव्हा मी खूप शांत होतो. आपण बरे आणि आपले काम असा स्वभाव.
पण त्याही वेळी मला काही जण भेटायचे अन् न मागता मोफतचा सल्ला द्यायचे. त्यात पार्टींमध्ये गेल्यावर शांत बसायचे नाही. भांडणे करायची, शाहरूख खान व्हायचे हा एक सल्ला असायचा. त्याला आता त्याचे हसू येते.
तो म्हणतो मी अशा कुटुंबातून आलो होतो जेथे मला चित्रपटसृष्टीची अगोदरपासून माहिती होती. मात्र, या क्षेत्रात बरेच जण असे येतात की त्यांचा अथवा त्यांच्या कुटुंबाचा कधीही या क्षेत्राशी संबंध आलेला नसतो.
अशा लोकांना हा सल्ला दिल्यावर त्यांचे काय होत असेल? बरे ही सल्ला देणारी मंडळी कुठेही भेटू शकतात. तुम्ही काम करत असलेल्या एखाद्या चित्रपटाच्या सेटवरही हे सल्लागार सहजपणे भेटतात.
पण तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे केले असेल, त्यासाठी कष्ट घेतले असेल तर त्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोच व तुमची दखलही घेतली जाते, असे तो नमूद करतो. तुषारने अलीकडेच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.
अभिनय करण्यापेक्षा निर्माता होणे मोठे अवघड काम असल्याचे तो नमूद करतो. मात्र, आपण हा रोलही एन्जॉय करतो आहोत, हे सांगायला तो विसरत नाही.