पणजी – भारतीय जनता पक्षातील बिघाड आता नियंत्रणाबाहेर गेला आहे. काही लोक पैशाचा वापर करून पक्षावर नियंत्रण ठेऊन आहेत, त्यामुळेच आपण हा पक्ष सोडून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे असा दावा गोव्यातील भाजपचे बंडखोर उमेदवार व दिवंगत माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी केला आहे.
आपल्या बंडखोरीच्या संबंधात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की गेल्यावेळी त्यांनी मला निवडणूक न लढवण्याची सुचना केली. मी ती मान्य केली. याहीवेळी त्यांनी मला नकार दिला. पण माझ्या ऐवजी त्यांनी माझ्या मतदार संघात जो उमेदवार दिला त्याविषयी माझा आक्षेप होता.
माझे माझ्या मतदार संघावर आणि तेथील लोकांवर प्रेम आहे. मी त्यांच्यासाठी काम करतो म्हणून मी त्यांच्यासाठी हा धोका पत्करला आहे. भाजप मध्ये सध्या केवळ पैशाचा खेळ सुरू आहे. पणजीतील लोकांना हे माहिती आहे. मी हे सगळे निमुटपणे पाहू शकत नाही म्हणून मी हा स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मी नेत्याच्या मुलांना महापौर होताना पाहिले आहे, अशा प्रवृत्तीच्या विरोधात मला लढावेच लागेल असेही उत्पल पर्रिकर यांनी या मुलाखतीत नमूद केले.