वन विभाग सक्रिय; डोंगरावरील वाटा होतायत निसरड्या
सातारा – साताऱ्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्याने सातारा शहर व परिसराचा निसर्ग बहरला आहे. छोट्या मोठया पर्यटनस्थळांवर पावसाली पर्यटन बहरले आहे. मात्र, पर्यटनाचा बेफामपणा जीवावर बेतू शकतो हे एकीवच्या दुर्घटनेने अधोरेखित केले आहे. पर्यटकांची सध्या निसर्गाच्या सानिध्यात भटकंती सुरू आहे. सातारा शहराचं हिरवं रूपड पाहण्यासाठी किल्ले अजिंक्यतारा व चार भिंती येथे गर्दी होत आहे यवतेश्वर घाट, कास पठार, एकीव भांबवली, या निसर्गरम्य ठिकाणी जाणे सुरक्षित असायला हवे यासाठी सातारा वन विभाग सक्रिय झाला आहे. आता पावसाळा सुरू झाल्याने डोंगर- दऱ्यातील वाटा, रस्ते घसरडे होऊ लागले असून नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
पावसाळ्यातील काही धोकादायक ठिकाणे
यवतेश्वर डोंगर :
यवतेश्वर डोंगरातून सांबरवाडीकडे पायी चालत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हा डोंगर तीव्र उताराचा आहे. चुकून जर एखाद्या व्यक्तीचे संतुलन चुकले तर पायवाटेवरील खडीवरून घसरुन कपाळमोक्ष होण्याचा धोका नेहमीच संभवतो. पावसाळ्यात या ठिकाणी भटकंतीसाठी जाणे शक्यतो टाळावे.
मंगळाई देवी परिसर :
अजिंक्यतारा किल्ल्यावर असलेल्या खालच्या मंगळाईदेवी मंदिराच्या मागील बाजूस घनदाट जंगल आहे. या जंगलात हौशी नागरिक चालण्यासाठी नेहमीच येत असतात. पावसाळ्यामुळे येथील पायवाटांवर चिखल साचतो. शिवाय पाला ओला झाल्याने त्यावरुन घसरण्याचा धोकाही संभवतो.
महादरेतील पायऱ्या :
महादरे गावातून यवतेश्वरकडे जाण्यासाठी ऐतिहासिक दगडी पायऱ्या आहेत. एक ट्रेकिंग पॉईंट म्हणून या पायऱ्यांकडे पाहिले जाते. हा परिसर देखील जंगलाने व्यापलेला असून, पायऱ्यांचे दगड पावसात गुळगुळीत होतात. त्यामुळे येथे भटकंतीसाठी जाणे जोखमीचे ठरते.
एकीव व ठोसेघर धबधबा :
कास पठाराच्या अलीकडे एकीव गावाजवळचा धबधबा सध्या चर्चेत आहे. दोन तरुणांचा धबधब्यात पडून मृत्यू झाला. येथील हुल्लडबाजी, धोकादायक जागी सेल्फी घेणे, धबधब्यात पोहणे हे प्रकार धोकादायक आहेत. येथे वनविभागाने रेलिंग बसवले आहे तरी ते ओलांडून जाण्याचा आतातायीपणा पर्यटक करतात यामुळे याला आवर घालण्याची वन रक्षकांची जवाबदारी आहे . मात्र त्यांच्याकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने सुरक्षा उपायांना मर्यादा येत आहे.
ही काळजी घ्याच..
पावसाळ्यात पर्यटनाला जाताना सुरक्षित ठिकाणे निवडा
धबधबे, तलाव, सरोवरात पोहण्याचा आततायीपणा करू नका
पर्यटनाच्या नियमांचे पालन करा
तातडीचे संपर्क क्रमांक जवळ ठेवा
धोकादायक ठिकाणी सेल्फीचा मोह टाळा