पिंपरी – देशभरातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची याचिकेबाबत चिंता करण्याचे कारण नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार सक्षमपणे आपली बाजू मांडणार असून, सर्वोच्य न्यायालयात ही याचिका फेटाळून लावली जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, तमिळनाडूतील जलीकट्टू आणि कर्नाटकातील कंबाला या रेड्यांच्या शर्यतींना दिलेल्या परवानगीचा फेरविचार करावा, अशी मागणी करणारी याचिका द पीपल फॉर दी एथिकल ट्रीटमेंट ऑफ ऍनिमल्स (पेटा) संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि राज्य सरकारने यामध्ये सकारात्मक लक्ष घालण्याची विनंती केली.
देशात बैलगाडा शर्यतींना व पारंपरिक खेळांना परवानगी देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दि. 18 मे 2023 रोजी दिला होता. त्या निकालामध्ये त्रुटी असल्याने निकालाचा फेरविचार करणे आवश्यक आहे, अशी भूमिका पेटा संस्थेने या याचिकेत मांडली आहे. त्यामुळे शेतकरी, गाडामालक आणि बैलगाडा प्रेमींची चिंता वाढली आहे.
अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे म्हणाले, बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी झाली आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने शर्यती सुरू करण्याबाबत निकाल दिला आहे. पुनर्विचार याचिकेचा फारसा परिणाम होणार नाही. राज्यातील शेतकरी, गाडामालक, बैलगाडा प्रेमींनी शासनाच्या नियमांप्रमाणेच शर्यतींचे आयोजन करावे. नियमांचे काटेकोर पालन करावे. ज्यामुळे भविष्यात शर्यतींबाबत कोणतीही अडचण येणार नाही.
महाराष्ट्रातील बैलगाडा शयर्तींबाबत राज्य सरकारने रनिंग ऍबिलीटी ऑफ बुल्स अर्थात बैलांची पळण्याची क्षमता आणि शरीररचना याबाबत महत्त्वपूर्ण अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. तसेच, कायद्यामध्ये आवश्यक सुधारणा आणि नियमावलीही केली आहे. असे असतानाही काही संस्था अधिकारांचा गैरवापर करुन शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा खेळ संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही बाब निश्चितच संतापजनक असून, याबाबत आम्ही न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सज्ज आहोत. न्याय शेतकऱ्यांच्या बाजुनेच होईल, असा विश्वास आहे.
-महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार