मुंबई – केवळ आरोप करत राहणे ही भाजपची जुनी सवय आहे. मागे ते म्हणायचे आम्ही बैलगाडी भरून पुरावे सादर करणार. 24 हजार पानांची पुराव्याची फाईल आमच्याकडे आहे. परंतु झाले काय, त्यांनी सादर केलेले पुरावे सगळे रद्दीत गेले आहेत.
त्यामुळे माझं त्यांना सांगणे आहे की तुम्हांला रद्दीचं हवी असेल तर कुर्ल्याला या मी तुम्हाला 10-20 ट्रक रद्दी देतो, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांची खिल्ली उडवली.
नवाब मलिक म्हणाले, सोमय्या हे प्रसार माध्यमांसमोर खोटे आरोप आणि खोटे बोलण्यात पटाईत आहे. जे आरोप करण्यात आले त्यात कुठेही तथ्य नाही. केवळ राजकीय हेतूने आरोप करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सदनबाबत आरोप करण्यात आले होते. त्यामधून भुजबळांना क्लिनचिट मिळाली आहे.
सध्या केवळ राजकीय हेतूने आरोप होत असून केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे. मात्र यातून काही साध्य होणार नाही. लोक दोषमुक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.
“त्या’ जागांवर ओबीसी उमेदवार
सध्या सरसकट निवडणूका होणार नाही. काही जिल्हापरिषदेच्या निवडणूक रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला होता. सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे जास्त काळ निवडणूक थांबवता येणार नाही. त्या निकालाचा फटका राज्यात बसू शकतो. त्याबाबत कायदा करून ओबीसी राजकीय आरक्षण टिकवण्याचा पर्याय राज्यासमोर आहे.
तो सर्वपक्षीय नेत्यांपुढे आणण्यात आला आहे. तो मान्य झाला तर तो करता येईल. अन्यथा दुसरा पर्याय आमच्या पक्षाने समोर ठेवला आहे. रिक्त झालेल्या त्या जागांवर आमचा राष्ट्रवादी पक्ष ओबीसी उमेदवार देणार आहोत, असे मलिक यांनी सांगितले.