वेळेत उपचार न मिळाल्याने गमवावा लागला जीव
डिकसळ प्रतिनिधी – देशभरात करोना रोगाच्या थैमानामुळे लॉकडाउन केले असताना महाराष्ट्र सरकारकडून जिल्हा सीमाबंदीचे आदेश देण्यात आले. पुणे आणि सोलापूर जिल्हा सीमा बंदीमुळे एका 65 वर्षीय नागरिकाला वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे.
ही घटना कोंढार चिंचोली (जि. सोलापूर) येथे घडली. शिवाजी सोपान डफळे (वय 65) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तात्काळ प्राथमिक उपचारांसाठी भिगवण (ता. इंदापूर) जाण्यासाठी निघाले. डिकसळ येथील भीमा नदीवरील पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणारा पूल बंद केल्यामुळे वेळेत उपचार मिळण्यात मोठी अडचण निर्माण झाली होती. यामुळे डफळे यांना जीव गमवावा लागल्याचा आरोप कुटुंबीयांकडून केला जात आहे.