पुणे – आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून 5 हजार विशेष गाड्या सोडाव्या असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दि. 25 जून ते 5 जुलै दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून, वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (दि. 27 जुन) 200 अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटी ने बससेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा प्रवाशी वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
चार तात्पुर्ती बस स्थानके उभारणार
वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, आयटीआय कॉलेज व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुर्ती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.