निवासी सरपंच प्रशिक्षणात संवाद
माळेगाव – कर्तृत्व हे पुरुषाकडे असते असे नाही. ते स्त्रीकडेही असते. समाजात कोणत्याही कामात स्त्रीला संधी मिळाली तर तिच्या हातून चांगले काम होते. ही भावना मनात ठेवून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना महिला आरक्षण मंजूर करून घेतले, असे मत माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र बारामती व यशदा पुणे यांच्या वतीने आयोजित पुणे, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद येथील उपस्थित निवासी सरपंच प्रशिक्षणात ते बोलत होते.
यावेळी यशदा उपसंचालक बी. एम. वराळे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, सत्र समन्वयक एस. डी. बिराजदार, आर. टी. दीघडे, संस्था समन्वयक प्रशांत तनपुरे, प्रशिक्षण प्रमुख सचिन खलाटे, संतोष गोडसे उपस्थित होते.
पवार म्हणाले की, ग्रामविकासाच्या कामात वाद, अडचणी असतात. पण पारदर्शक कामात कधीच तडजोड करू नका. सरपंच म्हणून मिळालेले अधिकार, जबाबदारी आणि कर्तव्य ही भावना मनात ठेवून गावातील प्राथमिक शिक्षण, महिला सबलीकरण, आरोग्य, स्थानिक प्रश्नाबाबतचे निर्णय पंचायत सदस्य व ग्रामस्थांनी एकत्र बसून घ्यावेत, गावाचा विकास हेच आपले ध्येय असले पाहिजे.
लोकांची कामे झाली तर लोक तुम्हाला पुन्हा सत्ता व पद आणि कामाची संधी देत असतात. यावेळी महिलांनी शरद पवार यांना अनेक प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांचे शंका निरसन केले. यावेळी उपस्थित महिलांनी ही भेट आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. ग्रामविकासाच्या कामात शरद पवार यांनी दिलेले मार्गदर्शन आणि विचार घेऊन आदर्श काम करू, अशी ग्वाही महिलांनी दिली.