खासदार डॉ. अमोल कोल्हे ः बंगळुरु येथे शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक
मंचर – सीमाभागातील मराठी बांधवांच्या समस्या व प्रश्नांविषयी संविधानिक मार्गाने संसदेत आवाज उठविण्याचे आश्वासन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बंगळुरु येथे छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊन परतताना महाराष्ट्र एकीकरण समिती व सीमाभागातील मराठी बांधवांना दिले.
बंगळुरु येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यावर दोषींवर कारवाई करावी आणि शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करावा. या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठी बांधवांना कर्नाटक सरकारने 47 दिवस तुरुंगात डांबून ठेवले.
सीमाभागात प्रचंड संतापाची भावना होती. त्यामुळे बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करुन मानवंदना देऊन परतणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि त्यांच्या टीमचे महाराष्ट्र एकीकरण समिती व सीमाभागातील मराठी बांधवांनी बेळगांव सह ठिकठिकाणी जोरदार स्वागत केले. विशेष म्हणजे रात्री 12च्या सुमारास पुण्याकडे परतत असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. कोल्हे यांचा बेळगांव येथे सत्कार करताना सीमाभागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाचा व अडचणींचा पाढा वाचला. या सत्काराला उत्तर देताना खासदार डॉ. कोल्हे यांनी सीमाभागातील मराठी बांधवांच्या समस्या व प्रश्नांविषयी संविधानिक मार्गाने संसदेत आवाज उठविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडूसकर, अमित देसाई, पियुष हवल, सागर पाटील, बळवंत शिंदोलकर, विकास कलगड, प्रकाश मरगाळी, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि इतर मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र एकीकरण समितीचा सत्कार स्वीकारुन पुण्याच्या दिशेने निघाल्यानंतर रात्री साडेबारा वाजता एका टोलनाक्याजवळ पुन्हा काही सीमावासीय मराठी बांधवांनी थांबवले व सत्कार केला. सोबतच सीमा प्रश्नाबाबतचे
गाऱ्हाणेही मांडले.