जामखेड – शासनाची प्रत्येक योजना गरजू आणि पात्र नागरिकांपर्यंत पोहचवणे हेच अधिकाऱ्यांचे पहिले कर्तव्य आहे. परंतु यात हलगर्जीपणा केला, तर गय केली जाणार नाही, असा इशारा अधिकारी, कर्मचाऱ्यांना आमदार रोहित पवार यांनी दिला.
जामखेड येथे 20 फेब्रुवारी रोजी महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, त्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याच्या नियोजनासाठी आढावा बैठक घेऊन महाराजस्व अभियान यशस्वी राबविण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, नगरपरिषदचे सीइओ सुहास जगताप, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, महावितरणचे कासलीवाल, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. युवराज खराडे, तालुका आरोग्य अधिकारी सुनील बोराडे, कृषी अधिकारी सुधीर शिंदे, उपअधीक्षक भूमिअभिलेख मनीषा धीवर, आगर प्रमुख महादेव शिरसाट, वन विभागाचे अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आमदार पवार म्हणाले, तालुक्यातील अधिकाऱ्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांबरोबर माहितीची देवाण घेवाण केली, तर ही योजना सक्षम पणे राबवू शकू. तसेच सरकारी अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशाताई या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय या योजनांची अंमलबजावणी करणे शक्यच नाही. त्यांना विश्वासात घेऊन लोकांसोबत त्यांचा योग्य समन्वय साधला, तर यात अडचण येणार नसल्याचे ते म्हणाले. तसेच चांगले काम करण्याना अधिकाऱ्यांचा देखील सन्मान होणार आहे. त्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि तरुण मित्र या सगळ्यांचे सक्रिय सहकार्य मिळत असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.