मुंबई: कोरोना काळात लोकांनी मास्क घालावे म्हणून प्रशासनाकडून नेहमी आवाहन करण्यात येत आहे. मात्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आजपर्यंत कधीच मास्क घातला नाही. सार्वजनिक कार्यक्रमासह मंत्रालयात झालेल्या बैठकीवेळीही राज ठाकरेंनी मास्क घातला नाही.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावेळी देखील विना मास्क उपस्थिती लावली.
अलीकडेच मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला शिवाजी महाराज पार्क येथे मनसेकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. तेव्हाही राज ठाकरेंनी मास्क घातला नव्हता. त्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारताच मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतोय असे म्हणत उत्तर दिले होते. इतकचं नव्हे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावेळीही राज ठाकरेंनी मास्क घातला नव्हता.
राज्यात मास्क न वापरणाऱ्या सर्वसामान्य लोकांवर जशी कारवाई होते, त्या पद्धतीने नेत्यावर देखील झाली पाहिजे. राज ठाकरे यांनी सरकारने दिलेले आदेश पाळले पाहिजेत. पण कदाचित राज ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश पाळायचा नसेल. त्यामुळे ते मुद्दाम मास्क वापरत नसतील, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. सातारा येथे रामदास आठवलेंची पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी रामदास आठवलेंनी राज ठाकरेंच्या मास्क न घालण्याच्या प्रश्नाला उत्तर दिले.
राज ठाकरे मात्र मास्कशिवाय फिरताना दिसतात. काही दिवसांपूर्वी राज यांना याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी मास्क न घालण्याचं आवाहन इतरांना केलं. यावरून ऍड. रत्नाकर चौरे यांनी औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राज यांच्या आवाहनामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.