नवी दिल्ली : देशात मध्यमवर्गीय कुटुंबातील लोक रोज अर्धा लिटर दुध घरी आणतात. त्यांचा विचार करुन सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. अर्ध्या लीटर दुधाच्या पिशवीची किंमत वाढणार असून एक लीटर दूध जुन्याच किंमतीत मिळणार आहे. केंद्र सरकारनेच देशभरातील सर्व दूध डेअरींना असे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अर्धा लिटर दुध आता सर्वसामान्य नागरिकांना महागात पडणार आहे.
मध्यमवर्गीय कुटुंब छोटे असल्याने अर्धा लिटरच्याच पिशव्यांमधून दूध घेतले जाते. मात्र, हे प्लॅस्टिक एकदाच वापरले जात असल्याने प्लॅस्टिक कचरा वाढत चालला आहे. यामुळे एकदाच वापरता येणारे प्लॅस्टिक कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. रिकाम्या पिशव्यांचा वापर रस्ते बांधणीसाठी करण्यात येणार आहे. यासाठी या वापरलेल्या पिशव्या द्याव्यात तसेच ऑक्टोबरपासून अर्धा लीटर पिशव्यांचे उत्पादन कमी करावे, असे म्हटले आहे. दुधाशिवाय दही आणि दुग्धजन्य उत्पादनांसाठी प्लॅस्टिक वापरले जाते. याचा एकदाच वापर होतो. अशाप्रकारचे एकदाच वापरता येणारे प्लॅस्टिक कमी करण्यास सांगण्यात आले आहे. किंमत वाढकिंमत वाढवल्याने लोक आपोआप खरेदी कमी करतील, अशी आशा सरकारला आहे. यामुळे अर्ध्या लीटर पिशवीच्या किंमती वाढवण्यात येणार आहेत.