अनिल देसाई यांचा सवाल : जिहे-कठापूरचे फुकटचे श्रेय घेऊ नये
सातारा – जिहे-कठापूर योजनेला मंत्रिमंडळाची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळून 350 कोटींचा निधी देण्याचे जाहीर झाले आहे. याचे खरे श्रेय भाजप सरकारचेच आहे. मात्र, माणचे विद्यमान लोकप्रतिनिधी या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ना. महादेव जानकर, ना. विजय शिवतारे आदींच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय झाला.
भाजपने केलेल्या कामांचे पेढे वाटून कॉंग्रेसवाले जनतेची दिशाभूल करत आहेत. योजनांचे फुकटचे श्रेय घेण्यापेक्षा गेल्या साडेनऊ वर्षात ही योजना व टेंभूचे पाणी माण-खटावमध्ये येण्यासाठी तुम्ही काय केले, या जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आव्हान भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी दिले आहे.
याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जिहे-कठापूर योजनेचे पाणी आंधळी धरणातून उचलून उत्तर माणच्या 32 गावांना द्यावे, अशी मागणी मी आणि डॉ. दिलीप येळगावकर यांनी 18 सप्टेंबर 2018 रोजी म्हसवड येथील जाहीर सभेत ना. चंद्रकांत पाटील व ना. महादेव जानकर यांच्याकडे केली होती. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा केला. दीड महिन्यापूर्वी या प्रश्नी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत बैठक लावून राणंद तलाव, जाशी तलाव भरण्यासाठी पाणी राखीव करण्यास तत्त्वतः मान्यात घेतली होती.
त्या बैठकीला माझ्यासमवेत डॉ. येळगावकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, रणजितसिंह देशमुख, डॉ. संदीप पोळ व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय असून त्याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. चंद्रकांत पाटील, ना. गिरीश महाजन, ना. महादेव जानकर, ना. विजय शिवतारे यांचे आहे.
माणच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी पाच वर्षांपूर्वी औंध भागातील 16 गावांतील लोकांना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्यपालांना भेटवले होते. या सोळा गावांचा पाणी प्रश्न सोडवतो, असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? विखळे आणि कुकुडवाड येथे झालेल्या टेंभू योजना पाणी परिषदेत भाषणबाजी करताना एका महिन्यात 32 गावांच्या पाणी योजनांसाठी 250 कोटी मंजूर करून घेणार, असे तुम्ही म्हणाला होता. त्याचे काय झाले? उगाच भाजपच्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नका. काम कुणी केले, हे माणच्या जनतेला माहीत आहे.