मुंबई : राज्यात गेले अनेक दिवस वेगवेगळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे कोरोनाच्या विळख्यात सापडलेले दिसून आलेले आहेत. अशा परिस्थितीत आपल्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयातील वर्तक नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातचं आपला मुक्काम ठेवला असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात राज्यात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कामाचा ताण, कोरोनाची भीती यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोधर्य खचण्याची भीती आहे. त्यामुळे ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी पोलीस ठाण्यातंच मुक्काम ठोकायचे ठरवले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड तब्बल वीस दिवसांपासून घरी गेले नाहीत. आपल्या गरजेचे सर्व साहित्य आणि कपडे पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या त्यांच्या केबिनमध्ये आणून ठेवले आहे. या केबिनमध्येच ते राहतात आणि याच केबिनमधून ते काम देखील करतात. केवळ संजय गायकवाडचा नाहीतर त्यांच्यासोबत आणखीन दोन अधिकारी देखील याच पोलीस स्टेशनमध्ये गेले वीस दिवस मुक्काम ठोकून आहेत.
वर्तक नगर पोलीस स्टेशन मधील तीन अधिकारी आणि सत्तावीस कर्मचारी आतापर्यंत संशयित म्हणून विलगीकरण त्यांचे करण्यात आलेले आहे. त्यामुळे इतर कर्मचारी हे द्विधा मनस्थिती असताना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उचललेल्या पावलामुळे तेदेखील अशा भीषण परिस्थितीत काम करण्यास प्रोत्साहित होत आहेत. या अधिकाऱ्यांच्या निर्णयाला ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर त्याचप्रमाणे डीसीपी अविनाश अंबुरे या मोठ्या अधिकाऱ्यांचे पाठबळ लाभलेले आहे.