मुंबई: मुंबईतील गर्दी कमी केल्याशिवाय करोनासारखा धोका कमी होणार नाही, असे विधान केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. त्याचा संदर्भ देत शिवसेनेने भाजपला सुनावले आहे की मुंबई, पुण्यासारखी स्मार्ट शहरे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये उभारा म्हणजे तेथील लोक मुंबईत येऊन गर्दी करणार नाहीत.
उत्तर प्रदेश आणि बिहार ही राज्ये सुधारली तरच मुंबईतील
गर्दीला आवर घालणे शक्य होईल, असे शिवसेनेने आपल्या मुखपत्रातील अग्रलेखात नमूद केले आहे. त्या राज्यांत रोजगार आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण केल्या गेल्या तर इथलीही गर्दी आपोआप कमी होईल, असे सेनेचे म्हणणे आहे.
लॉकडाऊनच्या काळात मुंबईतून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेलेले स्थलांतरित मजूर पुन्हा आता मुंबईत येऊ लागले आहेत. कारण त्या राज्यात त्यांना रोजगारच नाही. ती दोन महत्त्वाची राज्ये अविकसितच राहिली आहेत त्यामुळे त्याचा फटका तेथील लोकांना बसत असून रोजगारासाठी हे लोक मग मुंबईसारख्या महाराष्ट्रांतील अन्य शहरांमध्ये गर्दी करतात.
लॉकडाऊनच्या काळात सुमारे सात ते आठ लाख स्थलांतरित मजूर मुंबईतून उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांत परत गेले आहेत, असेही यात नमूद करण्यात आले आहे. पुण्यातूनही तीन लाख लोक आपल्या राज्यांत परत गेले आहेत. पण हे लोक आता पुन्हा परत येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यावरील बोजा वाढतो आहे. मोदी सरकारने जून 2015 मध्ये स्मार्ट सिटी योजना सुरू केली होती.
त्यातील किती शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकसित झाली, असा सवालही शिवसेनेने या अग्रलेखात उपस्थित केला आहे. साऱ्या देशातील लोकसंख्येचा भार मुंबई सोसत आहे. देशाच्या तिजोरीतही मुंबईतून मोठा निधी जमा होतो आहे. पण त्याबदल्यात केंद्र सरकारकडून मुंबई किंवा महाराष्ट्राला काहीच मिळत नाही, अशी तक्रारही यात करण्यात आली आहे.