नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने मंगळवारी अनेक राज्यांमध्ये प्रशासकीय यंत्रणा, सुरक्षा आणि खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. विशेष निरीक्षकांना प्रभावी उमेदवारांच्या निवडणूक प्रक्रियेवर कडक दक्षतेने देखरेख करण्याचे काम सोपविण्यात आले आहे.
विशेषत: पैसा, बळाचा वापर आणि खोडसाळ प्रचाराच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीच्या मैदानात कोणत्याही एका राजकीय पक्षाला एकतर्फी प्रभाव निर्माण करता येऊ नये आणि तेथे समतल स्थिती निर्माण व्हावी याची दक्षता घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून ही उपाययोजना करण्यात आली आहे.
पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, ओडिशा आणि बिहारमध्ये हे विशेष निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. ते तेथे सुरक्षा व प्रशासकीय गैरवापरावर देखरेख ठेवतील. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि ओडिशा येथे त्या खेरीज विशेष खर्च निरीक्षकही तैनात करण्यात आले आहेत.