Lok Sabha Election 2024 – आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाने मुंबईतील सहापैकी पाच लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारी केली असली तरी त्यांच्या पाचही उमेदवारांचा पराभव होईल, असे म्हणत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यानेच उद्धव ठाकरे यांच्या गटावर टीका केल्याने राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या उमेदवाराचा आपण प्रचार करणार नसल्याचे संजय निरुपम यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत संजय निरुपम देखील काँग्रेसचे उमेदवार होते. त्यावेळी त्यांना तीन लाख दहा हजार मते मिळाली होती. तर शिवसेनेचा उमेदवाराचा या निवडणुकीत विजय झाला होता. त्याला पाच लाख 70 हजार मते मिळाली होती.
मात्र, या मध्ये साडेतीन लाख मते ही भाजपची असल्याचा दावा संजय निरुपम यांनी केला आहे. तरी शिवसेनेमध्ये आता फुट पडली असून उद्धव ठाकरे यांच्याकडे किती मतदार आहेत, याचा अंदाज बांधणे अशक्य असल्याचे ते म्हणाले.
असे असताना केवळ उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे, अशा चर्चेवर त्यांना मुंबईतील पाच जागा देणे, हे चुकीचे असल्याचा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.