नवी दिल्ली -मी पाठवलेल्या पत्रांना उत्तरे न दिल्यास पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असा थेट इशारा राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना दिला. त्यामुळे पंजाबमधील आप सरकार आणि राज्यपालांमधील संघर्ष शिगेला पोहचल्याचे सूचित होत आहे.
मुख्याध्यापकांसाठी परदेशी प्रशिक्षण परिसंवाद, अंमली पदार्थांची समस्या या मुद्द्यांवर माहिती मागवणारी विविध पत्रं पुरोहित यांनी मान यांना पाठवली. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने पुरोहित यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्यांनी मान यांना कठोर भाषेत आणखी एक पत्र पाठवले आहे.
घटनात्मक यंत्रणेच्या अपयशावरून मी राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतो. तसेच, तुमच्या (मान) विरोधात फौजदारी प्रक्रियाही सुरू करू शकतो. त्यासंदर्भात मी अंतिम निर्णय घेण्याआधी मी मागवलेली माहिती उपलब्ध करावी. अन्यथा, राज्यघटना आणि कायद्याला अनुसरून कृती करण्याव्यतिरिक्त इतर पर्याय माझ्यापुढे उरणार नाही, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. पंजाब सरकार आणि राज्यपालांमध्ये विविध मुद्द्यांवरून सातत्याने संघर्ष होत आहे. तो संघर्ष आता विकोपाला गेल्याचे ताज्या घडामोडीतून स्पष्ट होत आहे.