मुंबई – केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील टीका टीप्पणी अद्याप थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी भेट दिल्यानंतर त्यांच्यावर शिवसेनेकडून टीका करण्यात आली होती. त्याला राणे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. आता राणे यांच्यावर शिवसेनेने कडाडून टीका करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असले तरी ते सहीपुरते आहेत. मातोश्रीच्या परवानगीशिवाय एकही फाईल हालत नाही,” असा दावा नारायण राणे यांनी केला होता. तसेच ते आमच्याकडे आले तर त्यांना पक्षात घेऊ असं राणे यांनी म्हटलं होतं.
यावरून पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी राणेंवर हल्लाबोल केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं आहे, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं आहे. त्यामुळेच ते एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असल्याचं म्हणत आहे, अशी जोरदार टीका पाटील यांनी केली.
एकनाथ शिंदे हे शिवसेना नेते आनंद दिघे यांचे चेले आहेत. ज्यांनी ठाणे येथे शिवसेनेचा झेंडा तेवत ठेवला त्यांचे शिंदे हे चेले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांचा शिंदेंबाबतच अंदाज हा हवामान खात्याप्रमाणे चुकीचा ठरणारा आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी राणेंचा दावा फेटाळून लावत जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले,’नारायण राणे जरी मंत्री असले तरी त्यांना धोरणात्मक निर्णय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच विचारुन घ्यावे लागतील.