जळगांव – भरधाव ट्रकच्या धडकेत दोघा दुचाकी स्वारांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री महामार्गावरील भालगाव फाट्याजवळ घडली. इंद्रसिंग दगडू पाटील (वय-28), भूषण कौतिक पाटील (वय-22, दोघेही रा. जळू, ता. एरंडोल) या युवकांचा अपघातात मृत्यू झाला. राखीपौर्णिमाच्या दिवशी घडलेल्या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
रविवारी रात्री बारा वाजताच्या दरम्यान इंद्रसिंग आणि भूषण दुचाकीवरून एरंडोलकडून जळू येथे येत होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर भालगाव फाट्याजवळील शहा पेट्रोलपंप येथे भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डाॅक्टरांनी मृत घोषित केले.
शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. दोन्ही युवकांवर दुपारी शोकाकुल वातावरणात जळू येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी युवकांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावली होती. दोन युवकांचा अकाली अपघातात मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली होती. ट्रक चालकाविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातात मयत झालेला भूषण औरंगाबाद येथे कंपनीत नोकरीस होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. तर इंद्रसिंग हा शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व तीन वर्षाचा मुलगा आणि एक वर्ष वयाची मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्त्या युवकांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.