गुवाहाटी – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी नापाक कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना कडक शब्दांत इशारा दिला. दहशतवाद्यांनी सीमेपलिकडून भारताला लक्ष्य केल्यास भारत सीमा ओलांडण्यास कचरणार नाही, असे ते म्हणाले.
भारत आणि पाकिस्तान या देशांत 1971 मध्ये युद्ध झाले.
त्या युद्धात सहभागी आसाममधील माजी सैनिकांना येथे विशेष सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. त्या सोहळ्यात बोलताना राजनाथ यांनी दहशतवाद बिल्कूल सहन न करण्याच्या भारताच्या धोरणाचा पुनरूच्चार केला. दहशतवादाविरोधात कठोर पाऊले उचलली जातील असा संदेश देण्यात भारत यशस्वी ठरला आहे. देशातून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकार कार्यरत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. देशाच्या पश्चिम सीमेवर काहीशी तणावाची स्थिती असते.
मात्र, बांगलादेश हा भारताचा मित्र असल्याने पूर्व सीमेवर शांतता आणि स्थिरता आहे. पूर्वेकडील सीमेवरून होणाऱ्या घुसखोरीची समस्या जवळपास संपुष्टात आली आहे, असे राजनाथ यांनी नमूद केले. सुरक्षा दलांना सशस्त्र दले विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) हवा असल्याचा गैरसमज निर्माण झाला आहे. मात्र, अफ्स्पा लागू करण्यासाठी सशस्त्र दले नव्हेत; तर परिस्थिती जबाबदार आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.