मुंबई – गेल्या 15 दिवसांपासून वरळी दोन कारणांनी चर्चेत आहे. पहिल्यांदा आदित्य ठाकरे यांची उमेदवारी या मतदारसंघातून जाहीर झाली आणि त्या पाठोपाठ बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनीही आपली उमेदवारी त्याच मतदारसंघात जाहीर करुन खळबळ उडवली. सातारकरांना बिचुकले नवे नाहीत. इथे केवळ उमेदवारी अर्ज करुन थांबले नाहीत तर, आल्या आल्या कोण आदित्य ठाकरे, असा प्रश्न विचारुन त्यांनी पहिला धमाका उडवला.
मूळ साताऱ्याचे असूनही वरळीतून उमेदवारी का असं विचारल्यावर ते म्हणाले, “वरळीशी माझा जुना संबंध आहे. माझी आत्या इथली. त्यामुळे वरळीचा हा समुद्र मला नवा नाही. मग इथून उमेदवारी अर्ज का भरु नये, असे मला वाटले. त्यातून मी हा मतदारसंघ निवडला. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघाबद्दलही त्यांनी प्रश्न उभे केले.
ते म्हणाले, “आता आदित्य राहतात वांद्रयात पण त्यांनी उमेदवारी वरळीतून भरली. असं का? त्यांनी तिकडूनच अर्ज भरायला हवा होता. पण तसं झालं नाही.” “मी सामान्य माणूस आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रमणारा नाही. मी इथे बसून लोकांचे प्रश्न सोडवीन. कितीही मोठं सरकार असेल तरी मी ठामपणे प्रश्न विचारेन,” असंही त्यांनी सांगितलं.
सरकारला विचारल्या जाणाऱ्या जाबानंतर राज ठाकरे यांच्या मुद्द्यांची आठवण बिचुकले यांना करुन दिल्यावर त्यांनी राज ठाकरे यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, राज ठाकरे जर खरंच विरोधी पक्षात बसणार असतील, तर मी राज यांच्यासोबत आहे. एकवेळ राज ठाकरे हालतील पण मी हालणार नाही, असेही त्यांनी सांगितले. या शिवाय, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, उदयनराजे भोसले आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दलची ठाम मतंही त्यांनी यावेळी नोंदवली.