नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून त्यात आज राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला. देशात एवढे सगळे घडत असताना पंतप्रधान गप्प आहेत. ते एवढे अहंकारी आणि भ्रष्ट आहेत का? देशातील लोक परस्परांशीच लढत राहीलेत तर देश विश्वगुरू होणार कसा, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
केजरीवाल म्हणाले की मणिपूरात 3 मे ते 31 जुलै या काळात साडेसहा हजार एफआयआर दाखल झाले आहेत. पंतप्रधान गप्प राहीलेत. 4 हजार लोकांचे घर पेटवले गेले, पंतप्रधान गप्प राहीले. 60 हजार नागरिक बेघर झाले तरीही ते गप्पच होते. दीडशेपेक्षा जास्त लोकांच्या हत्या झाल्या, साडेतीनशेपेक्षा जास्त धार्मिक स्थळे पेटवण्यात आली तरीही पंतप्रधान गप्पच आहेत. आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांच्यात भांडण झाले, गोळीबार झाला.
देशात यापूर्वी असे कधी झाले नव्हते. संपूर्ण जगात आज भारताची नाचक्की होते आहे. युरोपीय संघात, अमेरिकेत मणिपूरची चर्चा होते आहे. त्यांनी भारताला नावे ठेवली, मात्र पंतप्रधान त्यावर काही बोलले नाहीत. 4 मे रोजीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात एका महिलेला निर्वस्त्र करून फिरवण्यात आल्याचे दिसते आहे. अनेक लोकांनी तिच्यासोबत दुष्कृत्य केले. मुख्यमंत्री म्हणतात की अशा घटना येथे रोजच घडत असतात, त्यावरही पंतप्रधान काही बोलत नाहीत.
मोदींना लक्ष्य करताना केजरीवाल पुढे म्हणाले की पंतप्रधान पित्यासमान असतात. जेंव्हा सगळ्या यंत्रणा काम करण्याचे बंद करतात तेंव्हा लोक पंतप्रधानांची आठवण काढतात. घरात भाजी बनली नाही, पाणी आले नाही त्यावेळी लोक पंतप्रधानांची आठवण काढत नाहीत तर ज्यावेळी संपूर्ण यंत्रणा मोडकळीस येते तेंव्हाच लोक त्यांची आठवण काढतात. मणिपूरात ज्या मुलींसोबत गैरकृत्य झाले, त्यांच्यासाठी मोदी पित्यासमान आहेत. जेंव्हा मुली पंतप्रधानांना सांगतात की माझी अब्रू लुटली जाते आहे व तेंव्हा मला त्याच्याशी काही देणेघेणे नाही असे जर पिता म्हणत असेल तर त्या मुलींना जायचे कुठे? भारतीय जनता पार्टीचे दिल्लीतील विधायक आज म्हणत आहेत की त्यांना मणिपूरचे काही देणेघेणे नाही. हे केवळ काही आमदारांचे म्हणणे नाही तर खालपासून वरपर्यंत आपला मणिपूरशी काही संबंध नाही असा त्यांना मोदींचा आदेश आहे असा दावा केजरीवाल यांनी केला.