मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील मागच्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी हे उपोषण सुरु केले आहे. आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोवर आपण मागे हटणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. राज्यातील वेगवेगळे नेतेमंडळी जाऊन त्यांची समजूत काढत आहेत आहेत पण ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून विरोधक सरकारला कोंडीत पकडत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मराठा आरक्षणाची मागणी केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या विशेष अधिवेशनात त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय घेतला पाहिजे. यासाठी घटनेत तरतूद करावी, तसेच घटनादुरुस्ती केली पाहिजे. आरक्षणाविषयी सर्वसमावेशक असा तोडगा काढणं गरजेचं आहे. एवढचं आमचं म्हणणं आहे.असे म्हटले आहे.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी, महाराष्ट्रातला मराठा समाजाचा एक तरुण नेता अशा प्रकारे जीव पणाला लावत असेल आणि सरकार केवळ चर्चा, समित्या, उपसमित्या नेमण्यात गुंतून पडलं असेल तर ते योग्य नाही. कालच्या सर्वपक्षीय बैठकीत काय निर्णय झाले याबाबत बाहेर कोणाला काही पडलेलं नाही. तुम्ही अंमलबजावणी काय करताय? ते महत्त्वाचं आहे. असे म्हटले आहे.
तसेच “येत्या १६ किंवा १७ सप्टेंबरला मराठवाड्यात कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री त्यांची कॅबिनेट बैठक मराठवाड्यात घेत आहेत. परंतु, त्या बैठकीआधी त्यांना मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण गुंडाळायचे आहे. म्हणून ही खोटी आश्वासनं, समित्या, उपसमित्या नेमण्याचे प्रकार सुरू आहेत. जेणेकरून त्यांच्या मराठवाड्यातील बैठकीला अपशकून नको. लोकांनी रस्त्यावर उतरू नये, लोकांनी बंद पुकारू नये, मंत्र्यांवर हल्ले करू नये, सत्ताधारी आमदारांच्या गाड्या फोडू नयेत या भितीपोटी त्यांना मनोज जरांगेंचे आंदोलन गुंडाळायचे आहे. असा आरोपदेखील यावेळी संजय राऊत यांनी यावेळी केला.