नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत परत बसू न देण्यासाठी देशभरातील सर्वच विरोधी पक्ष एकवटले असल्याचे दिसत आहे. विरोधकांनी त्याच्या आघाडीला इंडिया नाव दिले असून यावरून देशभर एकच गोंधळ सुरु आहे. दरम्यान, विरोधकांच्या नावाला एकीकडे विरोध सुरु असताना दुसरीकडे याच आघाडीतील बड्या नेत्यांचा पाय खोलात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण या नेत्यांवर आता ईडीची करडी नजर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे येत्या काळात देशातील राजकारणामध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळणार आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ईडीचे संचालक संजय मिश्रा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदत वाढीचे शेवटचे चार दिवस उरले आहेत. यानंतर त्यांची नियुक्ती ईडी व सीबीआय दरम्यान समन्वय अधिकारी सी.आय.ओ अशी करण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात इंडिया आघाडीतील बड्या नेत्यांवर ईडीची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंडिया आघाडीमध्ये एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांवर येत्या काळात संकट कोसळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ईडीच्या रडारवर आहेत. याच प्रकारे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सुरेन, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्या कन्या कवीता, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी, काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांच्यावरही ईडीची करडी नजर राहणार आहे.
त्यासोबतच बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर ईडी येत्या काही दिवसात कारवाई करू शकते असे म्हटले जात आहे. संजय मिश्रा यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच ही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.