सिडनी : गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया आगीनं धुमसत आहे, या आगीत जळून लाखो प्राणी, पक्षी मृत्यूमुखी पडले आहेत. तर दुसरीकडे दुष्काळाचीही झळ सोसत असलेल्या ऑस्ट्रेलियावर 10 हजार उंटांची हत्या करण्याची वेळ आली आहे. येत्या पाच दिवसांत हेलिकॉप्टरमधून शार्पशूटर उंटांच्या कळपांना ठार करणार आहे.
पाणी आणि अन्नाच्या शोधात जंगली उंटांचे कळप इथल्या स्थानिक आदिवासी पाड्यांमध्ये शिरत आहेत. दक्षिण ऑस्ट्रेलियातील एपीवायमध्ये विलुप्त होत चाललेल्या आदिवासी जमातीचे पाडे आहेत. हजारो उंट या वस्तीत खाण्याच्या शोधात शिरत आहेत. दुष्काळामुळे पाणी, अन्नाचे दुर्भिक्ष्य आहे, त्यामुळे स्थानिकांनाच प्राथमिक गरजा भागवता येत नाही, अशातच उंटाचे कळप पाड्यात शिरून गोंधळ माजवत आहेत. या पाड्यात अडीच हजार लोक राहतात.
पाण्याच्या शोधात हे उंट वस्तीवर येत आहेत. पाण्याचे, खाद्याचे साठे उद्धवस्त करत आहेत. त्यामुळे टोकाचा निर्णय घेण्यात आला आहे. 2019 मध्ये ऑस्ट्रेलियातील अनेक ठिकाणी भीषण दुष्काळ पडला. त्यातून वणव्यामुळे अधिकाधिक जंगल जळून खाक झालं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर खूप मोठं संकट ओढावलं आहे.
उंट हे ऑस्ट्रेलियातले मूळ प्राणी नाही. 1840 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात उंट आले. या काळात अनेक धाडसी खलाश्यांनी जगाच्या पाठीवरील अनेक देशांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. 1840 नंतर पुढच्या 60 वर्षांत 20 हजार उंटांची भारतातून ऑस्ट्रेलियात आयात करण्यात आल्याची नोंद सापडते. आताची परिस्थिती पाहिली तर सर्वाधिक जंगली उंटाची संख्या ही ऑस्ट्रेलियात आढळते. हे जंगली उंट पाण्याचे स्त्रोत तसेच स्थानिक रोपटी, फुलांच्या प्राजातींनाही मोठे नुकसान पोहचवतात अशी स्थानिकांची तक्रार आहेत. या सर्वांमुळे 10 हजार उंटांना गोळ्या घालून ठार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी पाड्यांपासून दूर नेऊन त्यांची हत्या केली जाणार आहे. त्यानंतर काही काळांनी त्यांचे मृतदेह जाळून टाकण्यात येणार आहेत असल्याचे सांगण्यात येत आहे.