काठापूर परिसरातील विदारक स्थिती
लाखणगाव -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर येथे पावसाळा संपून गेला तरी शेतातील गोगलगायींच्या प्रमाणात वाढच होत आहे. हे वाढते प्रमाण काही केल्याने कमी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे.
काठापूर बुद्रुक येथील शेतात मोठ्या प्रमाणात शंख असलेल्या गोगलगायी आढळून येत आहेत.
मागील तीन वर्षांपासून या गोगलगायींचा शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करताना दिसून येत आहे. या गोगलगायी मोठ्या प्रमाणात शेती पिके खात आहेत. पावसाळा सुरू झाल्यावर या गोगलगायींचे प्रमाण वाढते.
पावसाळा संपल्यानंतर हे प्रमाण हळूहळू कमी होत असते, परंतु पावसाळ्यातील चार महिन्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात शेती पिके या गोगलगायींमुळे नष्ट होत आहेत. या भागातील पिकांची पाने, उगवलेली झाडेच खाऊन टाकत आहेत. सध्या पाऊस उघडून महिनाभराचा कालावधी उलटून गेला, तरी अजूनही शेतकऱ्यांना शेतात गोगलगायींचा त्रास जाणवत आहे.
या गोगलगायींवर कुठल्याही प्रकारचे औषध नसल्याने मागील तीन वर्षांपासून काठापूर बुद्रुक मध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सध्या अजूनही मोठ्या प्रमाणात शेतातील काही पिके गोगलगायी खात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
शेतकरी गोगलगायी पकडून त्यांना पिशवीत भरून ठेवल्यावर त्या नष्ट होतात. उन्हाळ्याच्या दिवसात गोगलगायी ओलाव्याच्या ठिकाणी आश्रय घेतात. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान करतात. सध्यातरी येथील शेतकरी या गोगलगायींमुळे त्रस्त झाला असल्याचे पहावयास मिळत आहे.