भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने जागतिक स्तरावर प्रतिष्ठेची मानल्या जात असलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले व नवा इतिहास रचला. खरेतर त्याची यंदाच्या स्पर्धेतील वाटचाल पाहता त्याच्याकडेच संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते. मात्र, अंतिम लढतीत त्याला डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसनने सरळ दोन सेटमध्ये पराभूत करत स्पर्धेचे दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. मात्र, तरीही भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तिसराच भारतीय खेळाडू ठरला व नव्या विक्रमाची नोंद केली.
ज्या खेळावर चीन, जपान, इंडोनेशिया, कोरिया व तैवानची मक्तेदारी होती, ती मातीमोल ठरवताना लक्ष्य सेनने आपली हुकुमतही सिद्ध केली. महिला टेनिसमध्ये जे काम सानिया मिर्झाने, क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने व महिला बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधूने केले तेच काम लक्ष्य सेन पुरुष बॅडमिंटनमध्ये यशस्वीरीत्या करत आहे. हीच केवळ लक्ष्यच्याच नव्हे तर भारतीय बॅडमिंटनच्या जागतिक वर्चस्वाची नांदी ठरत आहे. त्याने केवळ या स्पर्धेत अंतिम फेरीच गाठली असे नाही तर त्याने लहानपणापासून जे स्वप्न पाहिले त्याच वर्चस्वाची लक्ष्यपूर्तीही त्याने केली.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ब्रॉंझपदकाची कमाई करणाऱ्या लक्ष्य याने ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत नवा इतिहास रचला. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत त्याने मलेशियाच्या ली झी जिया याला पराभूत करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. तब्बल 21 वर्षांनंतर पुरुष गटातून एका भारतीय बॅडमिंटनपटूने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानावर असलेल्या सेन याने जीया याच्यावर विजय मिळवत जगभरातील समीक्षकांना आश्चर्याचा धक्काही दिला होता. 2001 साली भारताचा स्टार खेळाडू पुलेला गोपीचंद याने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर तब्बल दोन दशकानंतर लक्ष्यच्या रूपाने भारतीय खेळाडू अंतिम फेरीत दाखल झाला. आतापर्यंत भारताच्या प्रकाश नाथ यांनी 1947, महान खेळाडू प्रकाश पदुकोन यांनी 1980 व 1981, पुलेला गोपीचंदने 2001 तर, फुलराणी सायना नेहवालने 2015 साली या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. प्रकाश पदुकोन यांनी 1981 साली तर गोपीचंद यांनी 2001 साली ही मानाची स्पर्धा जिंकत इतिहास रचला होता.
कुटुंबाचा भक्कम पाठिंबा
घरातूनच एखाद्या खेळाडूला पाठिंबा मिळाला तर त्याची कारकीर्द वयाच्या विसाव्या वर्षीच कशी यशस्वी ठरते याचे उत्तम उदाहरण लक्ष्यच्या यशाकडे पाहिले की लक्षात येते. उत्तराखंडच्या अलमोडा जिल्ह्यात 16 ऑगस्ट 2001 रोजी लक्ष्यचा जन्म झाला. त्याचे वडील डी. के. सेन हे देखील राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक आहेत आणि मोठा भाऊ चिराग सेन हा देखील आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू आहे. त्यामुळे भावाकडूनच त्याने बॅडमिंटनपटू होण्याची प्रेरणा घेतली. दहाव्या वर्षीच तो त्याच्या वयोगटातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत होता. वडिलांकडूनच लहानपणी या खेळाचे धडे गिरवल्यानंतर व्यावसायिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी त्याने प्रकाश पदुकोन यांच्या बॅडमिंटन अकादमीत अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला.
सोळावे वरीस यशाचे
लक्ष्यने वयाच्या सोळाव्या वर्षांत 2016 साली मलेशियाच्या ली झी जियाला हरवून इंडिया ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. 19 वर्षांखालील वयोगटासाठीच्या आशियाई ज्युनिअर स्पर्धेत ब्रॉंझपदक पटकावले व तेथूनच त्याचा सामान्य खेळाडू ते वर्चस्व गाजवणारा खेळाडू असा प्रवास सुरू झाला. मात्र, त्याच्या यशापेक्षाही त्याच्या एका सामन्यातील पराभवानंतरही त्याचे कौतुक जगभरातील खेळाडू तसेच समीक्षकांनीही केले. न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दोन वेळचा ऑलिम्पिक सुवर्ण विजेता चीनचा खेळाडू लीन डॅनकडून लक्ष्यचा पराभव झाला होता. हा सामना डॅनच जिंकणार हे सर्वश्रुत होते मात्र, लक्ष्यने त्याला पहिल्याच गेममध्ये मागे टाकले. अर्थात डॅनने नंतरच्या दोन्ही गेम जिंकत सामनाही जिंकला. मात्र, त्यानेही लक्ष्य हा येत्या काळात जगजेत्ता बनेल असे भविष्य वर्तवले होते. तेच भाकित यंदा खरे होताना दिसत आहे. 2017 साली लक्ष्यने युरेशिया बल्गेरियन खुल्या तर इंडिया इंटरनॅशनलचे विजेतेपद आणि टाटा खुल्या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावताना आपल्या गुणवत्तेची साक्ष दिली. दरम्यान त्याच्या खांद्याला झालेल्या दुखापतीने डोके वर काढले व त्याला डॉक्टरांनी दिलेला विश्रांतीचा सल्ला मान्य करावा लागला व काही काळ स्पर्धांपासून दूर राहावे लागले. मात्र, त्याच विश्रांतीच्या कालावधीत त्याने आपल्या तंदुरुस्तीवर मेहनत घेतली. पायाचे, कमरेचे व्यायाम करून त्याने आपली तंदुरुस्ती जागतिक स्तरावर नावाजली जाईल इतकी भक्कम केली. दोन वर्षांपूर्वी ज्या आशियाई ज्युनिअर स्पर्धेत लक्ष्यने ब्रॉंझपदक मिळवले होते त्याच स्पर्धेत त्याने थायलंडच्या अव्वल मानांकित कुनलावुत वितीदसॅम याला पराभूत करून विजेतेपद पटकावत इतिहास रचला.
पदुकोन व गोपीचंदचा खरा वारसदार
प्रकाश पदुकोन व पी. गोपीचंद यांचा वारसदार म्हणून लक्ष्य खऱ्या अर्थाने पुढे आला आहे. भारतीय बॅडमिंटनला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे अनेक खेळाडू यापूर्वीही झाले. मात्र, वर्चस्व मिळवून देणारे पदुकोन व गोपीचंद हेच दोघे होते. लक्ष्यने वयाच्या दहाव्या वर्षीपासून आपल्या गुणवत्तेच्या जोरावर नवनवे यश मिळवले. आता त्याने ऑल इंग्लंड स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवल्यावर तर त्याच्याकडेच पदुकोन व गोपीचंद यांचा वारसदार म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जागतिक क्रिकेटमध्ये पाऊल ठेवत जग जिंकण्याचा इरादा स्पष्ट केला तेच काम लक्ष्य बॅडमिंटनमध्ये करत आहे. यंदाच्या वर्षात अनेक महत्त्वाच्या स्पर्धा होणार आहेत व त्यात लक्ष्य आपल्या यशाचं सातत्य राखतो का याकडे लक्ष लागणार आहे.
जागतिक क्रमवारीत आघाडी
बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने बीडब्ल्यूएफच्या जागतिक क्रमवारीत नववे स्थान पटकाविले आहे. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत लक्ष्य सेनला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे या स्पर्धेत त्यास रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना लक्ष्यने मानांकन मिळवले. 22 मार्च रोजी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत
लक्ष्य सेनने अकराव्या स्थानावरून नववे स्थान मिळविले आहे.
लक्ष्यच्या खात्यात 74,786 गुण आहेत. त्याने सध्याचा जगज्जेता सिंगापूरच्या लो कीन य्यूला मागे टाकले. ऑल इंग्लंड फायनलमध्ये सेनला ऑलिम्पिक चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीत अव्वल डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनकडून सरळ पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान सेनने स्विस ओपनमधून माघार घेतली आहे. थकव्यामुळे त्याने स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकाश्रयासह राजाश्रयाचीही गरज
बॅडमिंटन हा खेळ खरेतर भारतातच उदयाला आला मात्र, त्यावर राज्य केले ते चीन, कोरिया, इंडोनेशिया, तैवान व जपानने. हेच वर्चस्व गोपीचंदने मोडून काढताना आपणही या खेळाचे राजे आहोत हेच जगाला दाखवून दिले. लक्ष्य सेन याने खूप कमी वयात आपला दबदबा निर्माणच केला नाही तर प्रस्थापितही केला. क्रिकेट, फुटबॉल व टेनिसच्या पाठोपाठ हाच खेळ आपल्या देशात सर्वात जास्त खेळला जातो. या खेळाला लोकाश्रय आहे पण आता गरज आहे ती राजाश्रयाची. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सर्व राज्यांच्या क्रीडा मंत्रालयांच्या मदतीने देशभरात खेलो इंडिया किंवा टॉप्सच्या माध्यमातून बॅडमिंटन अकादमीचे सर्वदूर जाळे निर्माण केले व परदेशातील स्पर्धांमध्ये खेळाडूंना सातत्याने सहभागी होता आले तरच देशाला असे अनेक लक्ष्य सेन गवसतील. मात्र, त्यासाठी केवळ प्रयत्न करून चालणार नाही तर त्याची अंमलबजावणी करण्याची मानसिकताही वाढवावी लागेल. खेळाडूला देशाकडून खेळण्याचे स्वप्न पाहता येते पण त्याची पूर्तता केवळ त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावरच मिळते असे नाही तर त्या खेळाडूला सर्व स्तरावर पाठिंबाही आवश्यक असतो.
असो, लक्ष्य सेन या काळाचा हिरो ठरत आहे पण केवळ एकाच नावावर येऊन हा उल्लेख थांबू नये कारण ज्या पद्धतीने पदुकोन व गोपीचंदचा वासरदार म्हणून लक्ष्यचे नाव घेतले जाऊ लागले आहे तसेच लक्ष्यचेही वासरदार येत्या पाच वर्षांत तयार झाले पाहिजेत. त्यासाठी केवळ पदुकोन किंवा गोपीचंद यांच्याच अकादमीवर लक्ष ठेवण्यापेक्षा देशभरात त्याचे जाळे विणले गेले तरच या खेळात भारतीयांचे वर्चस्व चीन, जपानसारखी जागतिक बॅडमिंटनची सत्ता केंद्रेही मान्य करतील.
अमित डोंगरे