नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज पासून प्रारंभ झाला. प्रथेप्रमाणे पंतप्रधानांच्या निवेदनाने या कामकाजाची सुरूवात झाली. पंतप्रधानाकडून केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या मंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली जात असतानाच विरोधी सदस्यांनी महागाई व इंधन दरवाढीवरून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन आपला आवाज उठवला.
त्यांच्या या घोषणाबाजीने पंतप्रधानांच्या निवेदनात अडथळा आल्याने पंतप्रधानांनी मंत्र्यांची ओळख करून देण्याचे काम अर्धवटच सोडून दिले. सर्व मंत्र्यांची ओळख करून दिली आहे असे समजण्यात यावे असे निवेदन त्यांनी केले.
पंतप्रधानांच्या भाषणात विरोधकांकडून आणल्या गेलेल्या अडथळ्यांमुळे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हेही सदस्यांवर संतप्त झालेले दिसले. हा प्रकार सभागृहाच्या परंपरेला धरून नाही असे त्यांनी विरोधी सदस्यांना सुनावले. पण तरीही विरोधक शांत न राहिल्याने सभागृहाचे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकुब करावे लागले.
तत्पुर्वी विरोधकांच्या या गोंधळावर नाराजी व्यक्त करताना महिला, ओबीसी व शेतकरी समाजाच्या प्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान दिल्याची बाब विरोधकांना रूचली नसावी अशी टिप्पणी पंतप्रधानांनी यावेळी केली. विरोधकांच्या या कृत्यावर जोरदार आक्षेप घेऊन संरक्षण मंत्री राजनाथसिंह म्हणाले की माझ्या 24 वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत मी असा प्रकार पहिल्यांदाच पाहिला आहे.
पंतप्रधानांना मंत्र्यांची ओळख करून देण्याच्या कामात अडथळा आणून विरोधकांनी गैरवर्तणुक केली आहे. सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी विरोधकांनीही पार पाडली पाहिजे व सभागृहाची प्रतिष्ठा कायम राखली गेली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये हा प्रकार पहायला मिळाला आहे. हा प्रकार दुर्दैवी असून त्याचा आम्ही निषेध करतो असेही राजनाथसिंह यांनी नमूद केले. राज्यसभेत पीयुष गोयल यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली. राज्यसभेचेही कामकाज या गोंधळामुळे दुपारपर्यंत तहकुब करावे लागले.