मुंबई -भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांना स्थान मिळालेले नाही. ती बाब महाराष्ट्रातील स्थिती भाजपसाठी आव्हानात्मक असल्याचे सूचित करते, असे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.
उत्तरप्रदेशात लोकसभेच्या सर्वांधिक ८०, तर त्याखालोखाल महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत उत्तरप्रदेशातील तब्बल ५१ उमेदवारांचा समावेश आहे. मात्र, महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव त्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही.
त्यामुळे भुवया उंचावल्या गेल्या आहेत. अर्थात, महाराष्ट्रात भाजप सत्तारूढ महायुतीचा घटक आहे. त्या महायुतीचे जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही. त्या कारणामुळे भाजपने पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश टाळल्याचे मानले जात आहे.
तसे असले तरी यावेळी महाविकास आघाडीचे मोठे आव्हान महायुतीपुढे उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातून महाराष्ट्राबाबत सावध पाऊले उचलण्याची रणनीती भाजप अवलंबू शकतो. महाविकास आघाडीच्या पुढील हालचालींचा अंदाज घेऊन भाजप उमेदवार निवडीवर भर देईल, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.