फिरोजाबाद – देशात अनेक ठिकाणी पैशांची बचत व्हावी किंवा गोरगरिबांच लग्न व्यवस्थित व्हावं, यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन कऱण्यात येत आहे. यामधून नव दाम्पत्याला संसारासाठी हातभार लागतो. मात्र उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे बहिण-भावानेच मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजने अंतर्गत विवाह केल्याचे समोर आलं आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी संबंधित तरुणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजने अंतर्गत लग्न केलेल्या जोडप्यांचं व्हिरीफिकेशन प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत होतं. या विवाह सोहळ्यात 51 जोडप्यांचं लग्न लावून देण्यात आलं होतं.
फिरोजाबाद येथील टुंडला येथे हा विवाहसोहळा पार पडला होता. या विवाह सोहळ्यातील सर्व दाम्पत्यांना घरगुती साहित्याचे वितरण करण्यात आलं होतं. या सामूहिक विवाह सोहळ्याचे फोटो परिसरात सर्वांनी पाहिल्यानंतर दोघा बहिण भावाने यामध्ये विवाह उरकून घेतल्याचं समोर आलं. या व्यतिरिक्त आणखी चार जोडप्यांनी अशाच प्रकारे सरकारची फसवणूक केल्याचं सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपी भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सरकारची फसवणूक कऱणाऱ्या एका जोडप्याकडून सरकारच्या वतीने देण्यात आलेले साहित्य परत घेण्यात आले आहे.