मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक मोर्चा नेते तिथे आक्रमकपणे चप्पलफेक आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली. दरम्यान, या घटनेमुळे राज्यात एकच खबळबळ उडाली होती.
एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे या प्रकरणावर मोठे वक्तव्य समोर आले आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना वळसे पाटील यांनी, ”गुप्तचर विभागाने कळवूनही पोलिसांनी हवा तेवढा बंदोबस्त ठेवला नाही.” असे बोलून दाखवले आहे. “याबाबत रीतसर चौकशी सुरू आहे आणि या चौकशीत पोलिसांना जी काही माहिती मिळत आहे, ती माहिती पोलीस न्यायालयात सादर करत आहेत. त्यामुळे त्यासंदर्भात नक्की चौकशीचा भाग काय आहे, काय नाही? हे आता न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना, उघड करणे काही योग्य होणार नाही.” असे दिलीप वळेस पाटील म्हणाले.
त्याच बरोबर “ही गोष्ट खरी आहे की ४ एप्रिल रोजी गुप्तचर विभागाने पत्र लिहून कळवले होते, तरी देखील कमतरता राहिली. जेवढ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवायला हवा होता, तेवढा ठेवला गेला नाही. या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित पोलीस आयुक्तांची बदली केली आहे, गावदेवीच्या पोलीस निरीक्षकास निलंबित केलेलं आहे. चौकशी सुरू आहे, आणखी चौकशीत जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई करू.” असे देखील यावेळी गृहमंत्र्यांनी सांगितले.
याचबरोबर, आयएनएस विक्रांत प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला असून, सोमय्या पिता-पुत्र बेपत्ता असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना गृहमंत्री वळसे पाटील यांनी, “आम्ही केंद्राला विचारू की तुमची सुरक्षा असलेले लोक कुठे आहेत. आरोप करणं सोपं असतं, परंतु स्वत:वर आरोप झाले की त्याला सामोरं जायचं नाही, हे काही फार शूरपणाचं लक्षण नाही.”असे देखील गृहमंत्री म्हणाले आहेत.