Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडाने अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले गेले. त्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज व ज्येष्ठ नेते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. मात्र, अशा परिस्थितीतही जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साथ सोडली नाही. परंतु, काही दिवसांपासून जयंत पाटीलही अजित पवार गटाबरोबर जाण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील नेते हसन मुश्रीफ यांच्या एका वक्तव्याने सध्या एकच खळबळ उडाली आहे.
जयंत पाटील त्यांच्याविषयी बोलताना हसन मुश्रीफ यांनी, “जयंत पाटील यांनीही आमच्याबरोबर शपथ घेतली असती. आता मी इतिहास सांगत बसत नाही. ते गोपनीय आहे. मात्र, आज आम्ही ज्या पक्षाबरोबर गेलो आहे त्याच्याशी इमान ठेवणं आणि त्यांच्यासाठी जीवाचं रान करणं हा माझा स्वभाव आहे. आता आम्ही भूमिका बदलली आहे. त्या भूमिकेशी प्रामाणिक राहणं हे आमचं काम आहे, कर्तव्य आहे.”असे म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी “जयंत पाटील एका घटनेमुळे तिकडे थांबले. ती घटना मी माध्यमांना सांगणार नाही. ती घटना मी नंतर कधीतरी सांगेन. कारण मी नीतीमुल्ये पाळणारा माणूस आहे,” असे म्हणत हसन मुश्रीफ यांनी सूचक इशारा दिला आहे.
दरम्यान, शिर्डीतील आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. त्या टीकेला आता जयंत पाटील यांनी मोदींचाच एक व्हिडीओ पोस्ट करत उत्तर दिले आहे. किती हा विरोधाभास! आदरणीय शरद पवार यांनी ६० वर्षांत शेतकर्यांसाठी काहीही केले नाही असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात पवार साहेबांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती. अशी ट्विटरवर जयंत पाटील यांनी पोस्ट केली आहे.