शिंदे वासुली -पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनचे काम आसखेड हद्दीत भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी (दि. 1) बंद पाडले होते; मात्र काहीही झालेले तरी काम करायचे अशी ठाम भूमिका प्रशासनाने घेतली. व प्रकल्पग्रस्तांनी काम बंद पाडू नये म्हणून मंगळवारी (दि. 2) सकाळी महाळुंगे इंगळे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 130 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात जलवाहिनीचे काम सुरू करण्यात आले.
प्रशासनाच्या या दडपशाही विरोधात प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले असून जलवाहिनीचे काम बंद पाडणारच, प्रसंगी अटक झाली, गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही, असा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला आहे.
भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शासनाच्या दडपशाही भूमिकेचा निषेध करुन संताप व्यक्त केला आहे.
करोना आपत्कालीन परिस्थितीमुळे एकत्र येऊ आंदोलन करणे, बैठका घेणे, मोर्चा काढणे किंवा गावागावात फिरून आंदोलनाबाबत जागृती करणे प्रकल्पग्रसतांना अडचणीचे ठरत आहे. तरीही येत्या दोन-तीन दिवसांत चर्चा विनिमय करुन आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. आमच्यात कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न झाला तरी माघार घेणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे. जिल्हा प्रशासनाने परिस्थिती चिघळण्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांच्या मागणी संदर्भात तातडीने बैठक घेऊन शेतकऱ्यांचा विरोध कमी करण्याचा प्रयत्न करावा असे काही शेतकऱ्यांचे मत आहे.
करोना काळात संचारबंदी, जमावबंदी असल्याने आम्ही आमच्या मागण्यांसाठी संतप्त शेतकऱ्यांकडून एकत्र येऊन तिव्र आंदोलन होऊ शकते. मोठ्या प्रमाणात जमाव होऊन करोनाचा समूह संसर्ग झाल्यास शेतकऱ्यांचा जीवितहानीस शासन जबाबदार असल्याचे आंदोलक सत्यवान नवले यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची मागणी रास्त असून आम्ही वेळोवेळी याबाबत शासनाला रिपोर्ट दिला आहे. परंतु नुकतेच चाकण ते करंजविहीरे रस्त्याचे रुंदीकरण व नुतनीकरणाचे काम चालू आहे. रस्त्याचे कॉंक्रिटीकरणापूर्वी प्रलंबित असलेले एक किमी जलवाहिनेचे पैकी 900 मीटरचे काम पूर्ण करुन शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत 100 मीटरचे काम शिल्लक ठेवणार आहे. हे लोक हितासाठी व अपव्यव टाळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य कराव. लवकरच शेतकऱ्यांचा मागणीसंदर्भात खेड उपविभागिय अधिकारी संजय तेली शेतकरी व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतील.
-स्मिता पाटील, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय
वरिष्ठ मंत्र्यांचा आदेश?
पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा आदेश राज्याच्या वरिष्ठ मंत्र्यांनी दिलेला असल्याची कुणकुण लागल्याने वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भामाआसखेड प्रकल्पग्रस्तांनी शासनाने धोरण बदलावे, अन्यथा पवन मावळाची पुनरावृत्ती होऊ शकते. याची आठवण शासनाला करुन दिली आहे.