सनई-चौघड्याचे सूर, मंत्रोच्चारांमुळे वातावरण मंगलमय; हजारो भाविकांची उपस्थिती
म्हसवड (प्रतिनिधी) – म्हसवडचे ग्रामदैवत आणि राज्य व परराज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर शनिवारी मध्यरात्री उत्साहात झाला. पुरोहितांचे मंत्रपठण, सनई-चौघड्याचे सुमधूर स्वर, ढोलांचा ताल, हजारो भक्तांची उपस्थिती व श्रींच्या जयघोषामुळे वातावरण मंगलमय झाले होते. विवाहानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
दिवाळी पाडव्यापासून सुरू झालेल्या श्रींच्या विवाह सोहळ्यात पहिल्या दिवशी घटस्थापना, पंचामृताचा अभिषेक, नगरप्रदक्षिणा, भक्तांनी एका पायावर उभे राहून केलेले उपवास आणि राजेमाने बागेत श्रींच्या भेटीनंतर दिवाळी मैदान, असे कार्यक्रम झाले. त्यानंतर शनिवारी विवाह सोहळ्यादरम्यान घट उठवून उपवासाची सांगता आणि नगरप्रदक्षिणा झाली. आता बुधवार, दि. 27 रोजी श्रींची वरात म्हणजे रथोत्सव रिंगावण यात्रा होणार आहे.
बारा दिवसांचे उपवास करणाऱ्यांकडून घट उठवण्यात आले. सेवेकरी, मानकरी गुरव, सालकरी घडशी, दिवट्याधारी सालकरी सुनील कीर्तने व मठाधिपती रविनाथ महाराजांच्या उपस्थितीत फलाहार देऊन शनिवारी पहाटे उपवासाची सांगता करण्यात आली. विवाह सोहळ्यानिमित्त मंदिराला रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बाहेरगावावरून आलेल्या भक्तांनी श्रींच्या दर्शनासाठी शनिवारी सकाळपासून गर्दी केली होती. मंदिराच्या मागे बायपास रोडपासून यात्रा पटांगणात भक्तांची वाहने उभी करण्यात आली होती. मंदिराच्या आवारातील तीन दगडी दीपमाळा तेववत ठेवण्यात आल्या होत्या. मंदिराच्या आवारात खासबाग, कोले, खरा मळा येथील भक्त दिवसभर करत असलेल्या गजीनृत्याला शेकडो नागरिकांनी हजेरी लावली होती.
मंदिरातील हत्ती मंडपात असलेल्या पाच फुटी दगडी हत्तीवर दुपारी चार वाजता अंबारी ठेवून सुशोभित करण्यात आली होती. रात्री आरती झाल्यानंतर श्रींना पोषाख घालण्यात आला. श्रीच्या विवाहाच्या पोषाखाचा मान वामनराव माने कुटुंबीयांना मिळाला होता. श्रींचे सेवेकरी सुरेश पाटील यांनी दिलेल्या 15 हजार रुपयांच्या रुखवताच्या साहित्याची सालकऱ्यांनी लग्न मंडपात मांडणी केली. रात्री साडेअकरा वाजता गाभाऱ्यातील श्रींची उत्सवमूर्ती हत्ती मंडपात उभारलेल्या लग्नमंडपात नेण्यात आली. त्यावेळी दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांनी श्रींच्या मूर्तींना हात लावण्यासाठी गर्दी केली होती. हत्ती मंडपापासून गाभाऱ्यापर्यंत दिवटेकरी, पाळेकरी, सालकरी, सेवेकरी कडे करून उभे होते. लग्न समारंभासाठी सज्ज असलेल्या अंबारीत वधुवरांना म्हणजे उत्सवमूर्ती बसवण्यात आल्या. सुनील कीर्तने यांनी आंतरपाट धरला. पुरोहित अरुण पाठक, पिंटू पाठक,प्रज्योत पाठक, अभिराज केसकर यांनी मंत्रोच्चार करून सिद्धनाथ-जोगेश्वरी यांचा विवाह रात्री बारा वाजता पार पडताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भाविकांनी आणलेल्या ऊस, चिंचा, बोरे, ओटीचे साहित्य श्रींना अर्पण करण्यात आली
विवाह सोहळ्यास मानकरी अजितराव राजेमाने, गणपतराव राजेमाने, शिवराज राजेमाने, प्रतापसिंह राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, तेजसिंह राजेमाने, सयाजीराजे राजेमाने, चंद्रकांत गुरव, अजित गुरव (थडे), गंगाराम गुरव, मंगलदास गुरव, बाळासाहेब बुरुंगे, प्रवीण गुरव, दिगंबर गुरव, अशोक गुरव, शहाजी लांबोळी, गणेश लोहार, सागर तावरे, सचिन राजेमाने, गजानन तावरे उपस्थित होते.