नवी दिल्ली- कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना कर्नाटकाला लवकरात लवकर दुष्काळी मदत जाहीर करण्याची विनंती केली. यावेळी त्यांच्यासोबत महसूल मंत्री कृष्णा बायरे गौडाही होते.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदींना निवेदनही सादर केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील २३६ तालुक्यांपैकी २२३ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत, २०२०च्या दुष्काळ नियमावलीत नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार २२३ दुष्काळग्रस्त तालुक्यांपैकी १९६ तालुके गंभीर दुष्काळग्रस्त आहेत.अवर्षणामुळे सुमारे ४८.४९ लाख हेक्टर शेती आणि बागायती पिकांचे ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे, बहुतेक क्षेत्राचे नुकसान ८०टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
त्यातून लहान आणि अल्पभूधारक शेतकरी सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. कर्नाटक सरकारने पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन केले आहे. त्यानुसार राज्याने एनडीआरएफकडून ४६६३.१२ कोटी रुपयांचे इनपुट अनुदान मागितले आहे.
कर्नाटकच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सकारात्मक प्रतिसाद देईल आणि वरील मुद्द्यांवर लवकरात लवकर निर्णय घेईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. कर्नाटक सरकारने केंद्राकडे एकूण १८ हजार १७१ कोटी रूपयांची मदत मागितली आहे. तीन महिन्यांपुर्वीच कर्नाटक सरकारकडून केंद्राला या मागणीचे निवेदन दिले आहे पण केंद्राने अजून दाद दिलेली नाही.