Shri Krishna Mandir – राजस्थानचे मंत्री आणि भाजपचे नेते मदन दिलावर यांनी अयोध्येतील सोहळ्यानंतर नवा संकल्प जाहीर केला. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मभूमीवर भव्य मंदिर उभे राहीपर्यंत दिवसातून एकदाच जेवण करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. अयोध्येत राम मंदिर होईपर्यंत पुष्पहार न स्वीकारण्याची प्रतिज्ञा दिलावर यांनी १९९० यावर्षी केली होती.
त्यामुळे अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर ६४ वर्षीय दिलावर यांच्या सत्काराचे आयोजन त्यांच्या समर्थकांनी केले. त्या कार्यक्रमात दिलावर यांनी भगवान श्रीकृष्णाचा जयजयकार करून नवा संकल्प जाहीर केला. तो संकल्प तातडीने अंमलात आणणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत सहावेळा आमदार बनलेले दिलावर तिसऱ्यांदा मंत्रिपद भुषवत आहेत. त्यांच्याकडे सध्या शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी आहे. दिलावर यांनी याआधी जम्मू-काश्मीरशी संबंधित ३७० वे कलम हटवले जात नाही; तोपर्यंत बिछान्यावर न झोपण्याचा निर्धार केला होता. तो त्यांनी पूर्ण केला. झोपेसाठी ते चटईचा वापर करत, असे सांगितले जाते.