कोलकता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सोमवारी कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांवर निशाणा साधला. त्यामुळे बंगालमध्ये अद्याप इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे सूर जुळले नसल्याचे पुन्हा समोर आले.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या बंगालमधील जागावाटपावरून इंडियात सुरू असणारी धुसफूस दडून राहिलेली नाही. अशात ममतांनी सर्वधर्मीय सभेत बोलताना मित्रपक्षांविषयी नाराजी व्यक्त केली. इंडिया हे विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव मी सुचवले.
मात्र, त्या आघाडीच्या अजेंड्यावर डावे पक्ष नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे बैठकांमध्ये जाणवते. ज्यांच्याशी (डावे पक्ष) मी ३४ वर्षे संघर्ष केला; त्यांच्याशी सहमत होऊ शकत नाही. अपमान होत असूनही तडजोड करत मी इंडियाच्या बैठकांमध्ये सहभागी होत आहे, असे त्या म्हणाल्या.
आसाममधील मंदिरात जाण्यापासून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना रोखण्यात आले. त्याचा संदर्भ घेऊन ममतांनी कॉंग्रेसलाही लक्ष्य केले. केवळ मंदिरात जाणे पुरेसे नाही. आज किती राजकीय नेत्यांनी भाजपशी थेट मुकाबला केला? फक्त मी मंदिर, गुरूद्वारा, चर्च आणि मशिदीला भेट दिली, असे त्यांनी म्हटले.
भाजपच्या विरोधात लढण्याची ताकद आणि त्यासाठी लागणारा जनाधार माझ्याकडे आहे. मात्र, जागावाटपाविषयी काही जण आमचे म्हणणे ऐकू इच्छित नाहीत. त्यांना भाजपशी लढायचे नसेल; तर त्यांनी किमान भाजपला जागा तरी बहाल करू नये,
अशा शब्दांत ममतांनी मित्रपक्षांवर शाब्दिक हल्लाबोल केला. जागावाटपासाठी होणारा विलंब, किती जागा लढवायच्या याविषयीची असहमती आदींवरून तृणमूलने याआधीही नाराजी व्यक्त केली आहे.