मुंबई- मुख्यमंत्र्यांवर बोलणे ही सध्या फॅशन झाली आहे. त्याच्यामुळे टीआरपी वाढतो आणि प्रसारमाध्यमे देखील त्यांच्या मुलाखती घेतात. ज्यांचे अस्तित्व नष्ट झाले आहे, जे अनेक पक्ष फिरुन आले आहेत त्यांनादेखील एक मंच मिळतो. माझं तर आव्हान आहे की, मातोश्री दूर राहिले, अमरावतीच्या एखाद्या शाखा प्रमुखाच्या घरासमोर जाऊन आरती करावी, हनुमान चालिसा म्हणावी. ती तारीख आणि वेळ माझ्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला द्यावी. तर त्यांच ते फार मोठं कर्तृत्व ठरेल, असा टोला राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी लगावला आहे.
लोकप्रतिनिधी झाल्यानतंर राजकीय संस्कृती पाळावी. राजकीय संस्कृतीच नसेल तर त्यांच्यावर बोलण्याचा मला काही अधिकार नाही आणि त्यांना तितकं महत्वही देऊ नये. मातोश्रीवर येणं फार सोपं वाटत असेल तर त्यांनी तसे करून पाहावे, असे आव्हान सामंत यांनी राणा दाम्पत्याला दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या निवासस्थानी हनुमान चालिसाचे पठण करावे, अन्यथा मी आणि खासदार नवनीत राणा मातोश्रीवर हनुमान चालिसाचे पठण करू, असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. राणा दांपत्याचा अमरावतीमधील गंगा सावित्री या निवासस्थानासमोर हजारोंच्या संख्येने शिवसैनिक जमले होते. मात्र पोलिसांनी त्यांना आधीच अडवले.