औरंगाबाद : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. याच यंत्रणेचा वापर करत खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली असल्याचाही आरोप विरोधकांनी केला आहे. याचेच एक प्रत्यय राज्यातील एका शहरात झळकलेल्या पोस्टरवरून आले आहे. औरंगाबादमध्ये भाजपाविरोधात झळकावण्यात आलेलं पोस्टर अनेकांचे लक्ष वेधून घेत असून ते शहरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांनी शहरातील क्रांती चौकात हे भाजपाविरोधी पोस्टर लावलं आहे. “या देशात ऐतिहासिक बहुमताने भाजपाचं सरकार सत्तेत आलेलं आहे. अनेक राज्यांमध्ये भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांचं सरकार आहे. एवढ्यावरही त्यांची भूक भागत नसल्याने ते सातत्याने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहेत,” अशी टीका अक्षय पाटील यांनी केली आहे.
“आज या देशात ईडी आणि इतर केंद्रीय यंत्रणाचे प्रमुख भाजपाच्या घरगड्यांप्रमाणे वागत आहेत. ईडी ही भाजपाची दुसरी शाखाच झालीय,” असा टोलाही पाटील यांनी लगाला आहे. शहरातील काही प्रमुख चौकांमध्ये आणि मुख्य ठिकाणी पाटील यांनी हे बॅनर्स लावलेले आहेत.
“जे कोणी मला भाजपा नेत्यावर या केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केल्याचं दाखवले. किंवा काल-परवा भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांवर कारवाई झाल्याचं दाखवून देईल त्या नागरिकाला मी एक लाख रुपये बक्षीस देणार आहे. या संधीचा फायदा घेऊन अशी कारवाई दाखवण्याचा किमान भाजपा कार्यकर्त्यांनी तरी प्रयत्न करावा, असं माझं त्यांना आवाहन आहे,” असं पाटील यांनी प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओत या बॅनर लावण्यामागील संकल्पनेबद्दल सांगितलं आहे.