मुंबई – करोनाविषयक निर्बंध शिथिल झाल्यामुळे मागणी वाढत असूनही सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे वाहन उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी कंपन्यांकडून वितरकांना विकल्या जात असलेल्या वाहनाच्या संख्येत घट होत आहे.
सप्टेंबर महिन्यात बजाज ऑटोची विक्री 16 टक्क्यांनी कमी होऊन एक 92,348 युनिट एवढी झाली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये स्कोडा ऑटोच्या विक्रीत मात्र दुप्पट वाढ होऊन 3027 युनिट एवढी झाली आहे. भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीची विक्री 46 टक्क्यांनी कमी होऊन 86,380 इतकी झाली आहे.
ह्युंदाई या कार कंपनीच्या विक्रीतही 24 टक्क्यांची घट झाली. या महिन्यात कंपनीने 45,791 कार विकल्या. सप्टेंबर महिन्यामध्ये कार विक्री वाढविण्यात टोयोटो किर्लोस्कर कंपनीला यश मिळाले. या महिन्यांमध्ये या कंपनीने विकलेल्या कारमध्ये 14 टक्क्यांची वाढ झाली. सप्टेंबर महिन्यामध्ये या कंपनीने 9,284 कार विकल्या.
निस्सान इंडिया या कंपनीच्या विक्रीतही तीन पट वाढ होऊन या कंपनीने 780 कारची विक्री केली आहे. एस्कॉर्ट कंपनीच्या ट्रॅक्टर विक्रीत सप्टेंबर महिन्यात 25 टक्क्यांची घट होऊन या कंपनीने 11,851 ट्रॅक्टरची विक्री करण्यात यश मिळविले आहे. या महिन्यात एमजी मोटार कंपनीच्या विक्रीत 28 टक्क्यांची वाढ होऊन विक्री 3,241 इतकी झाली आहे.
सेमीकंडक्टरच्या तुटवड्याचा महिंद्रा कंपनीच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे या कंपनीची विक्री 22 टक्क्यांनी कमी होऊन 28,112 युनिट इतकी झाली आहे. टीव्हीएस मोटार कंपनीला आपली विक्री सहा टक्क्यांनी वाढवण्यात यश मिळाले. सप्टेंबर महिन्यात या कंपनीने 3,47 156 वाहने विकली.
नव्यानेच भारतात रुजू झालेल्या किया इंडिया या कंपनीच्या विक्रीत 23 टक्क्याची घट झाली. या कंपनीने 14,441 वाहने विकली आहेत. होंडा कार्स इंडियाच्या विक्रीत 34 टक्क्यांची घट होऊन या कंपनीने 6,765 वाहने विकली. इतर कंपन्यांच्या विक्रीत घट होत असताना टाटा मोटर्सची देशांतर्गत विक्री सप्टेंबर महिन्यात 26 टक्क्यांनी वाढून 55,988 इतकी झाली आहे.