नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने अचानक केलेल्या मोठ्या व्याज दरवाढीमुळे अगोदरच अडचणीत असलेल्या वाहन उद्योगावर आणखी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन या संघटनेने म्हटले आहे की, दरवाढीमुळे ग्राहक आगामी काळामध्ये वाहन खरेदी करण्याची शक्यता कमी झाली आहे.
भारतामध्ये दुचाकी वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र गेल्या काही महिन्यापासून दुचाकीची विक्री कमी झाली असताना व्याजदर वाढीचा या क्षेत्रावर जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे. या संघटनेचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितले की, सेमीकंडक्टरचा तुटवडा आणि इतर सुट्या उत्पादनाच्या अभावामुळे वाहन विक्री अगोदरच कमी झाली होती. मात्र रिझर्व्ह बॅंकेने अचानक आपल्या मुख्य व्याजदरांमध्ये तब्बल 0.40 टक्क्याची वाढ केली आहे.
आता व्यावसायिक बॅंका वाहन आणि इतर कर्जावरील व्याजदरात किमान 0.40 टक्क्याची वाढ करणार आहेत. महागाई वाढल्यामुळे ग्राहकांची क्रयशक्ती अगोदरच कमी झाले आहे. त्याचबरोबर करोनामुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. अशा अवस्थेत वाहनाचा वाढीव हप्ता देणे ग्राहकांना परवडणार नाही. त्यामुळे ग्राहक वाहन खरेदी करण्याची शक्यता कमी झाली आहे.
प्रवासी वाहनांचा हप्ता दीर्घ पल्ल्याचा असतो. त्यामुळे आगामी काळामध्ये परिस्थिती सुधारण्याची शक्यता असल्यामुळे प्रवासी वाहन विक्रीवर कमी परिणाम होणार आहे. मात्र ग्रामीण अर्थव्यवस्था खराब झाल्यामुळे दुचाकीच्या विक्रीवर जास्त परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
मार्च महिन्यामध्ये दुचाकींची विक्री चार टक्क्यांनी कमी होऊन 11,57,681 इतकी झाली होती. गेल्या काही महिन्यापासून सर्वच वाहनाच्या विक्रीमध्ये सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे घट झाली आहे. आता पुन्हा वाहनांच्या विक्रीत घट होण्याची शक्यता वाढल्यामुळे वाहन उत्पादकाबरोबरच वाहन वितरकाच्या व्यवहारावरही परिणाम होणार आहे.