राहाता -शिर्डी शहरातील व्यवसाय सुरू करताना शासन नियमांचे पालन करा. करोना या महामारीच्या काळात एक चूक सुध्दा शहराला माहागात पडेल, हे लक्षात घेवून शहरातील दुकाने सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत सुरू करण्यास आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी आणि शहरातील व्यापाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला.
करोना संकटानंतर शिर्डी शहरातील व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे श्री साईबाबांचे मंदिरही बंद झाल्याने भाविकांची गर्दीही कमी झाली आहे. याचा विपरित परिणाम शहरातील व्यवसायांवर झाला आहे. शहरातील बंद असलेले व्यवसाय सुरू व्हावेत, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून आ. विखे पाटील यांच्याकडे सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर शहरातील शासकीय विश्रामगृहात आ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिवाजी गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, विलास कोते, किशोर गंगवाल, दिलीप संकलेचा, नितीन कोते, सुजित गोंदकर, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्यासह व्यापारी प्रतिनिधी आणि हॉटेल व्यवसाय संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थित व्यापारी प्रतिनिधींनी विविध सूचना केल्या. मुख्याधिकारी दिघे यांनी व्यवसाय करण्याबाबत नगरपंचायतीची असलेली नियमावली वाचून दाखविली. त्यानंतर आ. विखे पाटील यांनी व्यवसाय सुरू करण्याबाबत कोणतीही अडचण नाही. परंतु नियमांचे पालन करण्याचे बंधन प्रत्येकावर राहील. एखाद्या व्यापाऱ्याची किंवा नागरिकाची चूकही शहराला संकटात आणू शकेल. यासाठी व्यवसाय सुरू करताना केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करा.
येणाऱ्या ग्राहकांना सक्तीने मास्क वापरण्याचे बंधन घाला. पुढील सूचना येत नाही, तोपर्यंत शहरातील लॉज, हॉटेल, ब्यूटीपार्लर, सलून, आईस्क्रीम दुकाने सुरू करता येणार नाहीत, असे आ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी शिर्डी शहरातील व्यवसाय सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत सुरू ठेवण्यास अधिकाऱ्यांनीही मान्यता दिली. रविवार आणि गुरुवारी या दोन्हीही दिवशी सर्व व्यवसाय बंद ठेवण्यावर एकमत झाले.
साई मंदिर लवकर खुले व्हावे
माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी शिर्डी शहरातील सर्व व्यवसाय हे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांवरच अवलंबून आहेत. यासाठी मंदिर लवकर उघडावे, म्हणून केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रयत्न करण्याची विनंती आ. विखे पाटील यांच्याकडे केली. हॉटेल आणि लॉज चालकांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन आ. विखे पाटील यांना देण्यात आले.